करमाळा (सोलापूर) : येथील श्रीराम प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस बांधवांना दोन वेळचे जेवण दिले आहे. श्रीराम प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबित असते. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना रोज संध्याकाळी मोफत भात- भाजी वाटप व करमाळा शहरातील निराधारांना जेवण दिले जाते.

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलिस बांधव बंदोबस्तासाठी असतात त्यांना मिरवणुकीमध्ये हॉटेल व दुकाने बंद असल्यामुळे जेवणाचे गैरसोय होऊ नये यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येतो. करमाळा पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष जगदीश अग्रवाल, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, काकासाहेब सरडे, अमोल पवार, पप्पू शिंदे, दिनेश गायकवाड यांच्यासह करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.


