करमाळा (सोलापूर) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत माजी आमदार नारायण पाटील यांनी विधानसभेबाबत केलेल्या विधानावर सध्या राजकीय नेते मंडळींकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘आजची सर्वसाधारण सभा ही कारखाना वाचवण्यासाठी होती कोणाची आमदारकी ठरवण्यासाठी नव्हती’, असे म्हणत माजी आमदार पाटील यांनाच शिवसेनेचे (शिंदे गट) महेश चिवटे यांनी घरचा आहेर दिला आहे.
अजूनही त्यांना राजकारणातच ‘रस’; आदिनाथमधील राजकीय वक्तव्यावरून गुळवे यांचा टोला
आदिनाथ सहकारी साखर कारखाना तीन वर्षांपासून बंद आहे. हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे जाणारा हा कारखाना थांबवण्यासाठी संचालक मंडळाला यश आले आहे. यात आदिनाथ बचाव समितीचीही भूमिका महत्वाची आहे. याशिवाय आदिनाथच्या प्रक्रियेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री तानाजी सावंत यांची मदत मिळत आहे. ‘मदत करणाऱ्यांचा आदिनाथच्या संचालक मंडळाला विसर’ पडला असल्याचे चिवटे यांनी म्हटले आहे.
Video : विधानसभेवरून पाटील व बागल यांच्यात प्रश्न- उत्तरे! शेवटच्या क्षणामुळे गाजली ‘आदिनाथ’ची सर्वसाधारण सभा
चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. माजी आमदार पाटील यांनीही शिंदे गुवाहाटीत असताना त्यांना पाठींबा दिला. कारखान्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री शिंदे, मंत्री सावंत, उपमुख्यमंत्री फडणवीस व मोहिते पाटील यांची मदत मिळत असल्याचे पाटील सांगतात. शुक्रवारी आदिनाथच्या सर्वसाधारण सभेत शेवटच्याक्षणी आदिनाथच्या संचालिका रश्मी बागल व पाटील यांच्यात विधानसभेवरून वाक्युद्ध झाले. त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.
दिदी म्हणतायेत 25 लाख दिले, डांगे म्हणाले कोठे आहेत? आदिनाथच्या सभेत जोरदार चर्चा
माध्यमांशी बोलताना चिवटे म्हणाले, बारामती ऍग्रोच्या तावडीतून आदिनाथ सहकारी साखर कारखाना सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडवणीस व आरोग्य मंत्री सावंत यांचा अभिनंदनचा ठराव न घेता आदिनाथ कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली. त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडणे आवश्यक होते. त्यांचा अभिनंदन ठराव न मांडल्याने आपण मदत करणाऱ्यांचा अभिनंदन ठराव मांडला.
सावंत यांनी आदिनाथ कारखाना सहकाराच्या मालकीचा राहावा यासाठी आर्थिक मदत केली आहे. याची जाणीव संचालक मंडळींनी ठेवावी. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आता आदिनाथमध्ये राजकारण आणू नये. यापुढे मंत्री सावंत सांगतील त्या पद्धतीनेच संचालक मंडळाने कारभार करावा. त्यांना अंधारात ठेवून कुठलीही काम करू नये. येणाऱ्या काळातील आमदार कोण यावर आज वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेली चर्चा वायफळ होती अशी चर्चा आदिनाथ व्यासपीठावरून होणे गरजेचे नाही. आदिनाथचे व्यासपीठ राजकारण विरहित असले तरच आदिनाथचा बचाव होणार आहे,’ असे ते म्हणाले आहेत.