साधारण पाच वर्ष वय असताना वडिलांचे छात्र हरपले. बालपणापासूनच आईने आमची जबाबदारी घेतली. जिद्दीने तिने भावासह आमचे शिक्षण पूर्ण केले. मी क्लास वन अधिकारी व्हावे ही माहेरच्या सर्वांची इच्छा होती. मात्र माझ्या मनात अधिकारी नव्हे तर नागरिकांची सेवा करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार सतत मनात येत! त्यातून डॉक्टर होण्याचा निश्चय केला आणि डॉक्टर झाले. आई आणि भाऊ यांनी जशी मदत केली तसे पती, सासरे, सासू यांनीही तेवढेच प्रोत्साहन दिले. दंत शल्य चिकित्सक डॉ. स्वाती अमोल घाडगे यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना आपला प्रवास उलगडला!
डॉ. घाडगे या दंत शल्य चिकित्सक आहेत. करमाळा शहरातील घोलप नगर येथे त्यांचे वरद क्लिनिक आहे. त्यांचे पती डॉ. अमोल घाडगे हे कान, नाक व घसा तज्ज्ञ आहेत. डॉ. घाडगे या उत्कृष्ट लेखिका आहेत. डॉक्टरकीच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देत त्या वाचन आणि लिखाणाचा छंद जोपासतात. अतिश संघर्षातून त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. सेवेच्या माध्यमातून त्यांनी रुग्णांचा विश्वास संपादन केला.

करमाळा शहरातील सागर सिनेमागृहाजवळ त्यांचे पूर्वी रुग्णालय होते. महाराष्ट्र बँकेच्या वरती त्यांचे रुग्णालय सुरु होते. मात्र एकेदिवशी पत्त्याच्या पानाचे घर जसे कोसळावे तसे त्यांचे रुग्णालय कोसळेल आणि केवळ रुग्णांचे आशीर्वाद म्हणून त्या सुखरूप राहिल्या. त्यातून सावरत त्यांनी नवीन ठिकाणी रुग्णालय सुरु केले. दरम्यानच्या काळात त्यांचे सासरे ऍड. नानासाहेब घाडगे यांचेही निधन झाले. आणि पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातून सावरून पुन्हा त्या सक्रिय झाल्या.
डॉ. घाडगे या प्रमाणिकपणे रुग्णसेवा करत सामाजिक कामातही अग्रेसर असतात. कोणतेही काम आपण प्रमाणिकपणे केले तर त्यात यश मिळते असं त्या म्हणत आहेत. डॉ. घाडगे यांचे नगर जिल्ह्यातील पारनेर हे महेर आहे. औरंगाबाद येथे त्यांनी BDS केले आहे. १० वी व १२ वीमध्ये त्या मेरिटमध्ये होत्या. त्यांचे मोठे बंधू इंजेनीयर आहेत तर छोटे बंधू लंडन इथे astrazeneca (covishield लस बनवलेली कंपनी) इथे डायरेक्टर आहेत. डॉ. घाडगे यांनी क्लासवन अधिकारी व्हावे, अशी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची इच्छा होती.
रुग्णाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, दात ही माणसाच्या शरीरातील एक अतिशय महत्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याची निघा राखणे हे त्याचे कर्तव्य आहे. लहानपणापासूनच त्याची निघा राखली पाहिजे. बालकांना दात स्वच्छ करण्याची सवय लागेपर्यंत पालकांनी त्यांचे दात स्वच्छ केले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीला दात ही निसर्गाची देण आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण करणेही आपलीच जबाबदारी आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम दातही बसवता येतात. त्याची व्यवस्था आपल्या रुग्णालयातही आहे. मात्र माझा रुग्णांच्या दृष्टीने नैसर्गिक दातच कसा राहील यावर नेहमी भर असतो. प्रत्येक डॉक्टरांची हीच भूमिका असते. डॉक्टर त्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु काही रुग्ण गैरसमजुतीतून कृत्रिम दात बसवण्याचा आग्रह करतात. किंवा डॉक्टरांना दोष देतात. मात्र कोणतेच डॉक्टर चुकीचा सल्ला देत नसतात. डॉक्टर हे नेहमी रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक असते, असे डॉ. घाडगे म्हणत आहेत.