करमाळा (अशोक मुरूमकर) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या २७० उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. तर दोघांच्या अर्जांवर आक्षेप आला असून त्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. साधणार पाच वाजता याचा निर्णय येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी आज (मंगळवारी) अर्जांची छानणी केली. तेव्हा सहकारी संस्था व बिगर ऊस उत्पादक गटातील दोन अर्जांवर आक्षेप आला आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २७२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्याची सुनावणी तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी ११ वाजता झाली. ऊस गाळपाची अट शिथिल झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. अर्जांवर कोणीही आक्षेप घेतले नाहीत. मात्र माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे सुजित बागल व शारदा मोरे यांच्या सहकारी संस्था व बिगर ऊस उत्पादक गटातील अर्जांवर आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे डॉ. केवारे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्याची निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांनी म्हणणं सादर केले असून निकाली प्रतीक्षा आहे.
या निवडणुकीत आमदार पाटील, माजी आमदार शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाचे माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे, बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, माजी उपसभापती चिंतामणी जगताप, शंभूराजे जगताप, संतोष वारे, सुहास गलांडे, चंद्रकांत सरडे, प्रा. रामदास झोळ, दशरथ कांबळे, रमेश कांबळे आदींचे अर्ज दाखल असून सर्व अर्ज मंजूर झाले आहेत.