समतेचा मूलमंत्र देऊन राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले व अध्यात्मातून 18 पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी करणाऱ्या या महात्म्याच्या पुण्यतिथीला आज 50 वर्ष झाली आहेत. वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या कार्याचे महत्त्व विशद करणारा लेख.
आजच्या युवकांना राष्ट्रसंत वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या समतेचा व एकात्मतेचा मूलमंत्र प्राप्त होऊन युवकांना निश्चितच ऊर्जा मिळेल. संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचा जन्म 1 जानेवारी 1891 रोजी झाला. मृत्यू 24 जानेवारी 1976 रोजी झाला. हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी संत आणि कीर्तनकार होते. संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिद्ध पुरुष, साक्षात्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामन भाऊ महाराज यांनी अध्यात्मातून 18 पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले आणि चालू असलेल्या अनिष्ट रूढी, चुकीच्या परंपरा व अंधश्रद्धा बंद करण्याचा उपदेश केला. भाऊंना प्रत्यक्ष पाहिलेले, त्यांचे अनुभव घेतलेले असंख्य लोक आजही हयात आहेत. त्यांचा शिष्य गण, त्यांनी घडवलेले अनेक कीर्तनकार, टाळकरी, वारकरी गहीनाथ गड येथे या महात्म्याच्या पुण्यतिथीला न चुकता हजेरी लावतात. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रातील लाखो, भक्तगण येथे भाऊंच्या समाधीच्या दर्शनाला येतात.
फुलसांगवी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड येथील तोलाजी ग्यानबा सोनावणे व बोरगाव चकला, तालुका गेवराई जिल्हा बीडचे विठोबा राख यांच्या कन्या राहीबाई यांचा विवाह झाला. या पुण्यवान माता पित्याच्या पोटी सद्गुरु संत वामन भाऊ महाराज यांनी जन्म घेतला. त्यांना ज्येष्ठ बंधू नारायण हे होते. माता राहीबाई या जुन्या प्रथेप्रमाणे बाळंतपणासाठी माहेरी बोरगावला गेल्या होत्या.
1891 रोजी श्रावण शुद्ध सोमवारी सूर्योदय समई यांनी या रत्नाला जन्म दिला. नाव ठेवले वामन भाऊ. भाऊ हे भगवान शंकराचे अवतार मानले जातात. माता राहीबाई यांच्या पोटी प्रत्यक्ष देवाने जन्म घेतला. हे त्यांचे भाग्य थोर असले तरी नियतीला काही वेगळेच घडवायचे होते. भाऊंचे संगोपन माऊलीच्या नशिबी नव्हते. भाऊंच्या जन्मानंतर अवघ्या चाळीस दिवसानंतर माता राहीबाई यांना देवाज्ञा झाली. मातेचे प्रेम या बाळाला मिळाले नाही. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळाचे संगोपन कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. राहीबाईने त्यांची आई आबाबाई यांना दृष्टांत दिला व सांगितले की, आई आता तूच माझ्या बाळाची आई हो. तूच माझ्या वामनचा सांभाळ कर. आबाबाई सकाळी झोपेतून उठल्या त्यांनी बाळाला जवळ घेतले आणि चमत्कार झाला. नातवासाठी आजीला पान्हा फुटला. या आजीनेच भाऊंना लहानचे मोठे केले. संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित करणारे वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज.
डोंगर दर्यातून पायपीट करून या महात्म्याने भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकावली. भाऊ हे अतिशय कडक स्वभावाचे होते असे म्हणले जाते. परंतु चोरी करायला आलेल्या चोरांनाही त्यांनी जेवण खाऊ घातले. या महात्म्याचा हाच प्रसंग पुण्यस्मरणाचा दिवस. भाऊ श्री शेत्र गहीनाथ गड येथे संत यादव बाबा यांचे उत्तराधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी वारकरी सांप्रदायाचे कार्य सुरू केले. आजीवन ब्रह्मचारी व्रत व त्यागी वृत्तीमुळे त्यांची परिसरात त्यांची ख्याती होती. वाचासिद्धी प्राप्त असलेल्या या साधने कधीही महिलांना पायावर दर्शन दिले नाही. महिलांना त्यांचे दुरूनच दर्शन घ्यावे लागे. आजही त्यांच्या समाधीचे दर्शन महिलांना बाहेरूनच घ्यावे लागते. भाऊंचा स्वभाव कडक होता व ते रागात काही बोलून गेले तर ते सत्य होत असे. म्हणून बरेच लोक लोक त्यांच्या जवळ जायला घाबरत होते. मात्र त्यांच्या शब्दाने असंख्य भक्तांचे कल्याणही झाल्याचे अनेक उदाहरणे समाजात आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी भाऊंकडे दाखल झालेले धामणगावचे रघुनाथ महाराज चौधरी भाऊंचे अनेक प्रसंग आपल्या कीर्तनात आवर्जून सांगतात. आज ज्या ठिकाणी श्री शेत्र गहीनाथ गडाचे बांधकाम आहे त्याच ठिकाणी पूर्वी मोजके बांधकाम झालेले होते. म्हणजे पत्र्याचा निवारा होता.
श्रावण महिन्यातील दिवस होते. रात्रीची वेळ रिमझिम पाऊस येत होता. गडावर सर्व भक्त झोपलेले होते. वामन भाऊंना जाग आली व हातात कंदील घेऊन बाहेर आले. सध्या यादव बाबा व खंडोबाची समाधी आहे त्याच्या मागच्या बाजूला एक छोटा नाला आहे. त्या नाल्यात कोणीतरी लपल्याची चाहूल बाबांना लागली आणि ते आत आले. त्यांनी आपले शिष्य दगडोबा व किसनबा यांना आवाज दिला. ते सहसा त्यांना एकेरीने हाक मारायचे त्याचप्रमाणे भाऊ म्हणाले, किसन्या दगड्या उठा जागे आहेत का झोपलेत, का मेलेत उठा भाऊंचे शब्द कानी पडताच ते दोघे उठले व काय बाबा काय झाले. असे त्यांनी विचारले त्यावेळी त्यांना बाबांनी बाहेर कोणीतरी माणसे लपलेले दिसत आहेत, जाऊन पहा बरं असे सांगितले. दगडोबा हे शरीराने धष्टपुष्ट पण भित्र्या स्वभावाचे होते, किसनबा हे किरकोळ पण धाडसी होते. भाऊंच्या आदेशाप्रमाणे ते दोघे तेथे गेले आणि थेट त्या लपलेल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांची चौकशी केली व तुम्हाला बाबांनी बोलावले असे सांगितले. भाऊंचा आदेश त्या चोरांनाही मोडता आला नाही . ही सर्व मंडळी भाऊंच्या समोर आली त्यावेळी भाऊंनी प्रश्न केला, तुम्ही कोण कुठले आणि येथे काय करता. त्यावर त्यांना खोटे बोलण्याचे धाडस न झाल्याने आपण बीड सांगवी चे असून चोरी करायला आलो असल्याचे सांगितले. घरी गेल्या आठ दिवसापासून खायला धान्य नाही व लेकर बाळ उपाशी आहेत, त्यामुळे आम्ही चोरी करायला आल्याचे त्यांनी सांगितले. भाऊंना त्यांची दया आली. त्या चोरांना भाऊ म्हणाले, आता तुम्ही जेवण करून येथेच आराम करा. त्यांना पोटभर जेवू घातले व सकाळी प्रत्येकाला प्रत्येकाला झेपेल एवढे धान्य सोबत दिले व त्या चोरांना घरी जाण्याची परवानगी दिली. परिणाम असा झाला की, या चारही चोरांनी पुढच्या एकादशीच्या वारीला भाऊंच्या हाताने तुळशीची माळ घातली व चोरी करण्याचे कायमचे सोडून दिले. गहीनाथ गड चिंचोली तालुका पाटोदा जिल्हा बीड हे संतश्रेष्ठ वामन भाऊ महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले क्षेत्र आहे. तेथूनच वामन भाऊ यांनी वारकरी सांप्रदायाचे कार्य सुरू करून सर्वत्र पोहोचविले.
- शब्दांकन. संभाजी शिवलाल बडे, संस्थापक,
स्वामी विवेकानंद युवा ग्रामविकास प्रतिष्ठान महाराष्ट्र
