करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत निवेदन दिले आहे. सात- बारा उताऱ्यावरील चूक दुरुस्तीसह अनेक कामांचा विषय यावेळी त्यांनी मांडला.
बाजार समिती संचालक नवनाथ झोळ, माजी सभापती अतुल पाटील, माजी उपसभापती दत्ता सरडे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, बिभीषण आवटे, भाजपचे अमरजीत साळुंके, शिवसेना तालुकप्रमुख देवानंद बागल, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जुनराव सरक, विकास गलांडे, माजी सरपंच हनुमंत सरडे, कुकडी संघर्ष समितीचे प्रमुख डॉ. अमोल घाडगे, बहुजन संघर्ष सेनेचे प्रमुख राजाभाऊ कदम, रामराजे उद्योग समूहाचे रविकिरण फुके, दिग्विजय अंबारे, संजय तनपुरे, स्वीय सहायक सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते.
माजी आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील कलम १५५ अन्वये ७/१२ उताऱ्यावरील चूक दुरुस्ती प्रकरणे व फेब्रुवारी २०२३ पासून प्रलंबित असलेली रस्ता प्रकरणाचा निपटारा होणे गरजेचे आहे. चूक दुरुस्तीची अंदाजे ८०० प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी व ग्रामस्थ चूक दुरुस्ती होण्यासाठी आपल्या कार्यालयाकडे अनेक वर्षापासून हेलपाटे मारत आहेत. त्यांच्या उताऱ्यावर चूक असल्यामुळे त्यांना कोणतीही बँक कर्ज देत नाही. तसेच जमीन, जागा खरेदी, विक्रीसाठी त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशी खंत या निवेदनातून पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी रेशन कार्ड, धान्य वितरण, संजय गांधी निराधार योजनेतील समाविष्ट लाभार्थी आर्थिक मदत, नवीन लाभार्थी नावे, शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर झालेल्या मदतीबाबत आदी इतर महत्वाच्या विषयावर माजी आमदार नारायण पाटील यांनी साविस्तर चर्चा केली. या भेटी दरम्यान संजय तनपुरे यांना कुणबी दाखला तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मान्यवरांचे उपस्थितीत दिला.