करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत करमाळा तालुक्यात काही गावात व शहरात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु केले आहेत. राजुरी येथे पाणी प्रश्न लक्षात घेऊन सुरु झालेल्या टॅंकरचे उदघाटन दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, राजाभाऊ भोसले व सचिन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एकनाथ शिंदे, आबासाहेब टापरे, गणेश जाधव, श्रीकांत साखरे, शरद मोरे, भाऊसाहेब जाधव व राजुरीतील नागरिक उपस्थित होते.
प्रा. झोळ म्हणाले, फाऊंडेशनच्या वतीने मागेल त्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर दिला जाईल. ज्यांना गरज आहे त्यांनी प्रा. रामदास झोळ फाउंडेशन कार्यालयाच्या (९४०५३१४२९६) या नंबर संपर्क साधावा. त्या गावाला टँकर देण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता तालुक्यात एकूण ११८ खेडी व वाडी वस्ती असून काही ठिकाणी प्रशासनाच्या वतीने फक्त ४३ टँकर मंजूर असून ४५ गावांना पाणी पुरवठा होत आहे, अशी माहिती टंचाई कक्षाचे विकास खंडागळे यांनी दिली आहे.
प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून उरलेल्या गावांना मागेल त्या गावात टँकर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसे मागणीचे प्रस्ताव फाउंडेशनच्याकडे जमा करावेत, असे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.