मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या नवीन मंत्र्यांचा आज (रविवारी) नागपूर येथील राजभवनात शपथविधी झाला. मात्र यात सोलापूरला डावलण्यात आले असनू कोणालाही मंत्रिपद देण्यात आले नाही. २०१९ ते २०२४ दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीनेही सोलापुरात कोणालाही मंत्री करण्यात आले नव्हते. यावेळी महायुतीमध्ये फडणवीस यांच्या सरकारमध्येही मंत्रिपदात सोलापुरातील कोणच नाही. त्यामुळे आता पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१४ ते २०१९ दरम्यान फडणवीस सरकारमध्ये विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांना मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने आणि पुन्हा महायुतीने सोलापूरला मंत्रिपद दिले नाही. महाविकास आघाडी सरकार असताना सोलापूरला दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड व दत्तात्रय भरणे यांना पालमंत्री करण्यात आले होते. महायुतीमध्ये चंद्रकांत पाटील व राधाकृष्ण पाटील यांनी पालकमंत्री म्हणून काम पाहिले होते.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे, देवेंद्र कोठे हे महायुतीमधील आमदार आहेत. महाविकास आघाडीचे नारायण पाटील, दिलीप सोपल, उत्तम जानकर, बाबासाहेब देशमुख, राजू खरे व अभिजित पाटील हे आमदार आहेत. महायुती सरकार आल्याने येथे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीमधील ३९ नवीन मंत्र्यांनी आज (रविवारी) शपथ घेतली. नागपूर येथे उद्यापासून (सोमवार) हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला नागपुरातील राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी या नवीन मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये भाजपच्या १९, शिवसेना (शिंदे गट) ११ व राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात ३३ कॅबिनेट व ६ राज्यमंत्री आहेत. या मंत्रिमंडळात नऊ नवीन चेहरे आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येथे उपस्थित होते. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, ऍड. आशिष शेलार, जयकुमार गोरे, अदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, गुलाबराव पाटील, अतुल सावे, शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, संजय राठोड, आशिष जयस्वाल, राधाकृष्ण विखे पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भारत गोगावले, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, गणेश नाईक, मकरंद पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत, शिवेंद्रसिंह राजेभोईसले, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, दत्तात्रय भरणे, योगेश कदम आदींनी शपथ घेतली आहे.