करमाळा (सोलापूर) : उजनीमध्ये बोट उलटून एकाच कुटुंबातील दुर्दैवी मृत्यू झालेल्या झरे येथील दोघांच्या कुटुंबियांना पोस्टाकडून २० लाखाचा अपघात वीमा देण्यात आला आहे. मे २०२४ मध्ये मनाला हळहळ व्यक्त करायला लावणारी ही घटना घडली होती.
यामध्ये झरेतील गोकुळ जाधव व कोमल जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांनी पोस्टाचा अपघात विमा उतरवला होता. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांना विम्याची रक्कम प्रत्येकी १० लाख अदा करण्यात आली. या कार्यक्रमाला पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक श्री. भोर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सरपंच सौ. मुसळे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक मैनेजर विनायक पासंगराव, करमाळा डाक उपविभागाचे प्रमुख राहुल जाधव यांच्यासह ग्रामस्थ व डाक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
भोर म्हणाले, ‘नागरिकांनी अपघात विम्यासोबतच पोस्ट विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. पोस्टल जीवन विमा, सुकन्यासमृद्धी योजना, पीपीएफ, बचत खाते अशा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विनायक पासंगराव म्हणाले, १० लाख अपघात विम्याचे विविध फायदे आहेत. फक्त ५५० रुपये वार्षिक प्रीमियममध्ये उपलब्ध आहेत. तसेच लाडकी बहीण आणि पीएमकिसन लाभार्थ्यांना पोस्ट ऑफिस बचत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.