करमाळा (अशोक मुरूमकर) : पती, सासू व सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना करमाळा शहरातील कानाड गल्लीत घडली आहे. सुसाईट नोटमध्ये ‘त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत’ असल्याचे संबंधित विवाहितेने म्हटले आहे. वैष्णवी प्रदीप माने (वय २५) असे आत्महत्या केलेल्या या विवाहितेचे नाव आहे. बुधवारी ११ जूनला राहत्या घरात तिने बेडरुममध्ये सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. संबंधित महिलेच्या आईने याप्रकरणात फिर्याद दिली आहे.
चारित्र्यावर संशय घेऊन व माहेर वरुन पैसे आणण्याच्या कारणावरुन मानसीक त्रास देत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पती प्रदीप भरत माने, सासरा भारत कोंडीबा माने व सासू कमल भारत माने अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
वैष्णवीचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. दोन वर्षापासून पती, सासू व सासरे ही तिच्या चारित्रावर संशय घेऊन माहेरवरून पैसे घेऊन येण्याच्या कारणावरून सतत त्रास देत होते, अशी तक्रार मुलीच्या आईने फिर्यादीत केली आहे. मुलीचा संसार व्यवस्थित होईल या आशेवर तिची समजूत घालत होत्या. तिला सतत मारहाण केली जात होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.