करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सहकाराचे मंदिर समजल्या जाणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रचार सुरु आहे. या निवडणुकीमध्ये तीन पॅनल रिंगणात आहेत. बागल गटांनी या निवडणुकीपुरते थांबण्याची भूमिका घेतलेली आहे. या कारखान्याच्या आडून बागल गटाला टार्गेट करण्याच्या नादात आदिनाथचे नुकसान व बदनामी होत असल्याने कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार चर्चेअंती बागल गटाने हा निर्णय घेतलेला आहे व त्यावर ठाम आहे, असे दिग्विजय बागल यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘प्रचारादरम्यान आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी ठोस असा कृती कार्यक्रम कुठल्याही पॅनलच्या किंवा गटाच्या वतीने प्रचारादरम्यान सांगण्यात येत नसून अद्याप एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यातच प्रचाराचा वेळ घालवल्याचे दिसून येत आहे. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याविषयी संपूर्ण तालुक्याला आस्था असून बागल गट देखील या आस्थेचा आदर करतो. परंतु कारखान्याची निवडणूक जिंकण्याकरिता जो प्रचार होत आहे. त्यामधून श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरील कर्ज तसेच सुरु करण्याची प्रक्रिया आणि त्याच्यासाठी भविष्यात कुठला ठोस कृती कार्यक्रम आखणार आहोत हे अद्यापी कुठल्याही गटाने सभासदांसमोर ठोकपणे सांगितले नसल्याने बागल गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. बागल गटाने अजून कोणालाही पाठिंबा दिला नसून कुणी पाठिंब्याविषयी वक्तव्य करत असेल तर ती अफवा आहे, असे समजावे तसेच बागल गटाला मानणाऱ्या सर्व सभासद व कार्यकर्ते यांनी याची नोंद घ्यावी. सर्वांच्या विचाराने सर्वानुमते योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी तटस्थ रहावे’, असे आवाहन बागल यांनी केले आहे.