‘मकाई’च्या निवडणुकीवर कोळगावकरांचा बहिष्कार!

Boycott of Kolgaon on the election of Makai sakhar karkhana Karmala taluka

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर कोळगावमध्ये बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. गावातील काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला असून आम्हाला विचारात घेतले जात नाही आणि जो येथून उमेदवार आहे. तो मान्य नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

कोळगाव हे चिखलठाण ऊस उत्पादक गटात आहे. येथे ८५ मतदान असून येथील हिवरे मतदान केंद्रावर मतदान आहे. या ऊस उत्पादक गटातील सतीश नीळ व अप्पासाहेब सरडे हे बिनविरोध झाले आहेत. येथे बागल गटाच्या विरोधात कोळगाव येथील नंदकुमार पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा अर्ज नामंजूर झाला. त्यानंतर त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती.

पाटील म्हणाले, चिखलठाण ऊस उत्पादक गटातील दोन्ही उमेदवार बिनविरोध आहेत. मुळात हे उमेदवाराचं मान्य नाहीत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची गावात बैठक झाली. तेव्हा बागल गट आपल्याला विचारात घेत नाही. बैठकीला कोणत्याही सांगत नाहीत. कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचे पैसे राहिलेले आहेत, अशा स्थितीत ही निवडणूक होत आहे. नवीन चेहरे या कारखान्यात आले पाहिजेत. मात्र ज्यांना संधी दिली आहे ते खरोखर कारखाना अडचणीतून बाहेर काढतील का? हा प्रश्न आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, बागल गटाने कोळगावला कधीच विचारात घेतलेले नाही. त्यामुळे आम्ही आता आमची ताकद दाखवून देणार आहोत, असा निर्णय बैठकीत झाला आहे. आमच्या हक्काचे उसाचे पैसेच मिळाले नाहीत तर आम्ही त्याच गटाच्या उमेदवरांना मतदान का आणि कशासाठी करायचे? आतापर्यंत आश्वासनच आयकत आलो आहोत लोकांची बिल क्लिअर करा लगेच मतदान करू, असाही निश्चय यावेळी करण्यात आला असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *