करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात सध्या नाला सफाईचे काम सुरू आहे. छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन पावसाळ्यात कोणताही नाला तुंबणार नाही याची काळजी घेतली जात आहे. काही वर्षांपूर्वी करमाळ्यात नाल्यात आलेल्या पाण्यात व्यक्ती वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती. पुन्हा अशा घटना घडू नयेत याची दक्षता घेतली जात असून यावर्षी लवकर पाऊस सुरु झाल्याने पावसाळापूर्व काम करण्यासाठी मात्र करमाळा नगरपालिकेची दमछाक झाल्याचे दिसत आहे. पावसाळ्यात नाल्यांचा प्रवाह वाहता रहावा याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
करमाळा शहरात भवानी नाका, जामखेड रोड, नगर रोड, कर्जत रोड व पुना रोड (रंभापूरा व कुंभारवाडा) या बाजूला मोठे ओढे (नाले) आहेत. यामध्ये पावसाळ्यात जास्त पाणी येते. या नाल्यांमध्ये स्वच्छता नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी येते. त्यातून दुर्घटना झाल्याचे प्रकार घडले आहेत. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाहता रहावा यासाठी नाला सफाई होणे आवश्यक आहे. यावर्षी हे काम पारदर्शकपणे होत असल्याचे दिसत आहे. मात्र पाऊस लवकर सुरु झाल्याने अजूनही काम सुरु आहे. आता काम करण्यासाठी काही अडचणी येत असल्याचे दिसत आहे.
नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात यंदा पारदर्शकता असल्याचे दिसत आहे. पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून करमाळा शहरातील नाल्यांची सापसपाईचे काम वेगाने सुरू आहे. भवानी नाका, कुंभारवाडा, गणेश नगर, रंभापूरा येथील नाला या ठिकाणांचे काम सुरु आहे. अधिकाऱ्यांनी भेट देत या कामाची पाहणी केली. प्रत्येक वर्षी पावासाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता, गाळ काढणे आदी कामे करावी लागतात. लहान- मोठ्या नाल्यातून गाळ काढण्याचे काम सुरु असून राहिलेले काम चार ते पाच दिवसात होणार आहे. यावर्षी लवकर पाऊस झाल्याने पावसाळापूर्व उद्दिष्टापैकी काही काम राहीले आहे. वीज वितरण कंपनीच्या तारांमुळे व काही ठिकाणी जलवाहिनीमुळे काम करण्यात अडचण येत आहे. याबाबत संबंधित विभागाला कळवलेदेखील आहे. काही ठिकाणी लवकर झालेल्या पावसामुळे गाळ असल्याने मिशनला काम करता येत नाही. मात्र तेथेही पर्याय निवडला असून काम करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
पालिकेचे आवाहन…
नागरिकांनी नाल्यात बाटल्या, पिशव्या असा तरंगता कचरा टाकू नये. यामुळे ओढ्यांवरील नळ्यांच्या तोंडाला पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे. नाल्याच्या दुतर्फा तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आरोग्याच्या काळजीने कचरा हा कचराकुंडीतच टाकण्याचे आवाहन स्वच्छता निरीक्षक विपुल पुजारी यांनी केले आहे. कचरा संकलनासाठी पालिकेची रोज घंटा गाडी येते. नागरिकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणीच कचरा टाकावा. त्यांचेही या नाले स्वच्छता प्रयत्नांमध्ये योगदान आहे. शहर स्वच्छ रहावे यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
नागरिकांची मागणी
१) कुंभारवाडा परिसरात नाल्यामध्ये घाण आहे. या भागात स्वच्छता करण्याचे काम सुरु आहे. मात्र रंभापूरा परिसरात ज्याप्रमाणे नाल्याचे काम झाले आहे. तसेच काम स्मशानभूमीपर्यंत व्हावे. त्यामुळे नाल्यात दुर्गंधी होणार नाही. शिवाय पाण्याचाही निचरा होणार आहे.
२) कुंभारवाडा परिसरात असलेल्या पुलावरून दरवर्षी पाणी वाहते. येथे यापूर्वी दुर्घटना झाली होती. त्यामुळे याठिकाणी नव्याने पुलाचे काम होणे आवश्यक असून पाणी येथे तिथपर्यंत गार्ड बसवणे आवश्यक आहे.
३) भवानी नाका परिसरात अजूनही नाला स्वच्छ झालेला नसून त्याची त्वरित स्वच्छता होणे आवश्यक आहे. काही ठिकाणी रस्त्यावरून पुलाच्या बाजूला रस्ता खचला आहे. त्यामुळे धोका होऊ शकतो याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
प्रतिक्रिया
रंभापुरा- कुंभारवाडा पुल ते मोहल्ला गल्ली ओढा ते स्माशानभुमीपर्यंत नाला सफाई करण्यात यावी. कुंभारवाडा पुल हा पुर्णपणे मोडकळीस आला असून रस्ता खराब झाला आहे. त्या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. त्यामुळे तेथे नवीन आणि प्रशस्त पुल व्हावा.
– जमीर सय्यद, अध्यक्ष, सकल मुस्लीम समाज करमाळा
पावसाळ्यापूर्वी नालेसपाई होणे आवश्यक होते. आता होत असलेल्या कामाची आम्ही पहाणी करणार आहोत. यापूर्वी झालेल्या दुर्घटनेचे पुनर्ववृत्ती होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. काम चांगले व्हावे यासाठी आम्ही लक्ष घालणार आहोत.
– यशपाल कांबळे, वंचित बहुजन आघाडी
अमरधाम स्मशानभूमी परिसरातील नालेसपाई झाले आहे. अजूनही हे काम सुरु असून चांगले काम करून घेण्यासाठी आमचे त्यावर बारकाईने लक्ष आहे. कोठेही पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
– संजय सावंत, माजी नगरसेवक
नालेसपाईच्या कामाबाबत आम्ही स्वतः काही फोटो मुख्याधिकाऱ्यांना पाठवले आहेत. त्यावर त्यांनी वीज वितरण कंपनीची अडचण सांगितली आहे. त्याचा पाठपुरावा करून मोठा पाऊस येण्यापूर्वी काम करून घ्यावे.
-संजय घोलप, मनसे