करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका स्वच्छतेबाबत सध्या ऍक्शन मोडवर आली आहे. वारंवार सूचना देऊनही उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने आता अशा ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. याबाबत मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी जनजागृती करण्यासाठी फलक लावले आहेत. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर दंड आकारण्याचा इशारा दिला आहे.
करमाळा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्याला नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. कचरा संकलनासाठी पालिकेची घंटा गाडी नागरिकांच्या दारात येते. त्यामध्येच कचरा टाकणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी उघड्यावर किंवा रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. शेजारील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. याशिवाय शहरही स्वच्छ दिसत नाही. त्यामुळे आता अशा ठिकाणे निश्चित करण्यात आली असून कचरा टाकताना कोण आढळले तर १५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.
पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विपुल पुजारी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना म्हणाले, ‘नागरिकांना कचरा टाकण्यासाठी दोन वेळेस घंटा गाडी फिरवण्याची व्यवस्था केली आहे. तरीही काही ठिकाणी नागरिक कचरा टाकत आहेत. त्याचा परिणाम सर्वांना सहन करावा लागत आहे. सतत घड्यावर कचरा पडणारी दहा ठिकाणे आहेत. तेथे जनजागृती व्हावी म्हणून फलक लावण्यात आले आहेत. तरीही कचरा टाकला तर कारवाई केली जाणार आहे.
ही आहेत ठिकाणे…
करमाळा शहरात पोथरे नाका परिसरात भाजी मार्केट, एसटी स्टॅण्ड प्रवेशद्वारे, फंड गल्ली, किल्ला विभाग, मोहल्ला, जीन मैदान अशा ठिकाणे सतत कचरा टाकला जात आहे. हा परिसर स्वच्छ रहावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.