करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत (शिंदे गट) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे बागल गटाची काय प्रतिक्रिया असेल याबाबत करमाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली होती. अखेर या प्रवेशावर शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
करमाळा तालुक्यात कायम गटातटाचे राजकारण चालते. पक्षापेक्षा येथे गटाला महत्व नागरिक देतात. पाटील गटाचे नेतृत्व आमदार नारायण पाटील, शिंदे गटाचे माजी आमदार संजयमामा शिंदे, बागल गटाचे दिग्विजय बागल व रश्मी बागल व जगताप गटाचे नेतृत्व माजी आमदार जयवंतराव जगताप हे नेतृत्व करतात. बागल व जगताप हे पारंपरिक विरोधक आहेत. सध्या दिग्विजय बागल हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. ते विधानसभा निवडणुकीत करमाळ्याचे उमेदवार होते. तर माजी आमदार जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार पाटील यांना पाठींबा दिला होता. आता जगताप यांनी चिवटे यांच्या माध्यमातून शिवसेनेत गेले आहेत. त्यावर दिग्विजय बागल यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
दिग्विजय बागल म्हणाले, ‘माझे नेते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी नेत्यांचा निर्णय असतो. नेत्यांचा निर्णय मानणारा मी आहे. प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे का? हा महत्वाचा विषय आहे. माझी नेत्याशी याबाबत चर्चा झालेली आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्याबाबत सांगितले आहे. यापूर्वी आमची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे आम्ही आता सर्व दक्षता घेऊन काम करत आहोत. आम्ही कोणाला या आणि कोणाला जा म्हणू शकत नाहीत. त्यांनी प्रवेश केला असला तरी आम्ही एकत्रित काम करू शकत नाहीत,’ असे बागल म्हणाले आहेत.