करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल दहा वर्षांनी काल (शुक्रवारी) करमाळ्याची आमसभा झाली. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी साडेअकरा वाजता सुरु झालेली ही सभा सायंकाळी साडेपाच वाजता संपली. सहा तास चाललेल्या या सभेत नागरिकांनी केलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला होता. दरम्यान तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनीच मध्यस्ती करत ‘नागरिकांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तर देण्याची’ सूचना करत तापलेले वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘यापुढे नागरिकांची अडचण खपवून घेणार नाही’ असा इशारा आमदार पाटील यांनी दिला. या सभेच्या बॅनरवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा फोटो होता मात्र त्यांची अनुउपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांना एकत्र आणण्यासाठी आमसभा ही अत्यंत महत्वाची आहे. यामुळे नागरिकांचे प्रश्न थेट समजतात आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी मदत होते. करमाळ्यात आमसभा बंद पडल्याची प्रथा आमदार पाटील यांच्या पुढाकाराने सुरु झाली आहे. पावसामुळे या सभेचे ठिकाण बदलले होते. मात्र तरीही याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसला. या सभेसाठी खासदार मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला होता. परंतु ते या सभेला नव्हते.
आमदार पाटील यांनी करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसासिंचन योजनेबाबत धोरणात्मक ठराव मांडला. त्याला सर्वांनी सहमती दिली. ‘दहिगाव योजना ही तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. मागच्या काळात सर्वांच्या सहकार्याने समाजकारण व राजकारण करत असताना बळ मिळत आहे. तालुक्याच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेऊन सर्वानी हातभार लावावा. करमाळा विधानसभा मतदारसंघातील ३६ गावांचाही विकास झाला पाहिजे. भविष्यात राजकारण न करता सर्वांनी एकत्र यावे,’ असे आवाहन त्यांनी केले. ‘कुकडीच्या पाण्यासाठी पंधरा वर्षात मामा व बागल यांनीही काम केले. मात्र अंतर जास्त असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. त्यासाठी भविष्यात रिटेवाडी उपसासिंचन होणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे,’ असे आमदार पाटील म्हणाले.
दहिगाव उपसासिंचन ही महत्वकांशी योजना आहे. २२ गावातील १० हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. परंतु उजनी पंपगृहाची पाणी उचलण्याची क्षमता 490 मीटर आहे. त्यामुळे करमाळा तालुक्याला हक्काचे पाणी मिळत नाही. भीमा सिना बोगदा 488. 20 मीटर आहे. मराठवड्यासाठी जाणाऱ्या बोगद्याची ऊंची 487 मीटर आहे. दहिगावची ऊंची कमी असल्याचे योजना लवकर बंद होते. त्याचा परिणाम शेतीवर होत आहे. त्यासाठी पाणी उपसा पातळी 490 वरुन 485 करण्याचा ठराव आमदार पाटील यांनी मंडला. आमदार पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम व पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करत यांच्या माध्यमातून करमाळ्याची विकासाठी योगदान देईचे आहे, असे सांगितले.