करमाळा (सोलापूर) : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा केम (करमाळा) येथे जोडे मारो आंदोलन करत निषेध करण्यात आला. प्रहार संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन झाले. यावेळी देण्यात आलेल्या घोषणानी परिसर दणाणला.
प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या पैशावर देश चालतो. अन्नधान्य आम्ही पिकवतो, आमच्या मतावर तु व तुझा बाप पण निवडुन येतो. अन् आमचा बाप काढतो. शेतकरी ही जगाचा पोशिंदा आहे. भाजप आमदार लोणीकर यांना सत्तेची मस्ती आल्याने असे वक्तव्य करत आहेत. त्याचा निषेध.’ प्रहारचे जिल्हा सरचिटणीस बापू तळेकर, एपी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अच्युतकाका पाटील, उपसरपंच सागर कुरडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सागर दोंड, ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह ओहोळ, गोरख पारखे, शरद वायभासे, विष्णू अवघडे, दादासाहेब पारखे, किरण तळेकर, सौदागर बिचीतकर, पिनु तळेकर, सुरेश गुटाळ, अविनाश कुलकर्णी उपस्थित होते.