करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकार साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल झाले सर्व म्हणजे २७२ अर्ज मंजूर झाले आहेत. त्यामुळे आता लक्ष लागले आहे ते कोण माघार घेणार याकडे? त्यातच आता दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख आणि करमाळा तालुक्याच्या राजकारणात काही दिवसांपासून चर्चेत आलेले नाव म्हणजे प्रा. रामदास झोळ यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागणार आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आदिनाथ बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतर निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले. विशेष म्हणजे ते सर्व अर्ज मंजूर झाले आहेत. आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जगताप यांच्यासह बागल कुटुंबीय स्वतः निवडणुकीत नसले तयारी त्यांच्या गटाचे अर्ज आहेत. त्यामुळे २ एप्रिलपर्यंत कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले आहे.
प्रा. झोळ म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा कारखाना आहे. तालुक्यात मकाई आणि आदिनाथ हे सहकारी साखर कारखाने आहेत. मात्र मकाईची स्थितीत सर्वांना माहिती आहे. आदिनाथही अडचणीत आहे. येथे ज्याप्रमाणे सर्वांचे अर्ज मंजूर झाले त्याप्रमाणे मकाईत का? अर्ज मंजूर झाले नाहीत हा प्रश्न आहे. आदिनाथ अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक दृष्टी ठेऊन काम करावे लागणार आहे.’
बिनविरोधबाबत बोलताना ते म्हणाले, ‘आदिनाथ सहकारी साखर कारखाना बिनविरोध करायचा असेल तर आम्हीही तयार आहोत. मात्र बिनविरोध संचालक घेताना त्याने स्वतः एक कोटी गुंतवण्याची तयारी दाखवावी. कारण हा कारखाना अडचणीतून बाहेर काढताना राजकारण बाजूला ठेवावे लागणार आहे. कारखाना सुरु करण्यासाठी लागणारे पैसे तयार करावे लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने १ एक कोटीची तयारी ठेऊन याचा हंगामात कारखाना सुरु कसा होईल याबाबत लक्ष द्यावे लागणार आहे.’
पुढे बोलताना प्रा. झोळ म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना निवडणूक लढायची याची आमची पूर्ण तयारी आहे. हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी साधणार पाच एमडी यांच्याशी बोललो आहे. त्यामुळे कारखाना अडचणीतून बाहेर कसा काढायचा याचे नियोजन आमच्याकडे आहे. कारखाना बिनविरोध करून कोणाला चालवायला देणे किंवा भाडेतत्वावर देणे याला आमचा विरोध असणार आहे. या आधी हा कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी विरोध झाला. मग पुन्हा आता भाडेतत्वावर कशाला देईचा? असा प्रश्न त्यांनी केला आहे. केवळ राजकारण म्हणून आदिनाथचा कोणी बळी देऊ नये’ असेही ते म्हणाले आहेत. यावर्षी ऊसाचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे या हंगामात हा कारखाना सुरु होणे आवश्यक आहे’, असेही ते म्हणाले आहेत.