‘दहावी व बारावीनंतर पुढे काय?’ विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकमध्ये मार्गदर्शन सत्र

इंदापूर (पुणे) : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकमध्ये आज (शनिवारी) ‘दहावी व बारावीनंतर पुढे काय?’ या विषयावर मार्गदर्शन झाले. तंत्र शिक्षण संचनालयचे माजी संचालक डॉ. नवनाथ बी पासलकर, ब्राइट स्टार्स इलेक्ट्रॉनिक्स, पुणे येथील इंडस्ट्रियलिस्ट CEO प्रा. पद्माकर केळकर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पुणे येथील प्रा. प्रा. खडके, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पुणे येथील प्रा. येडे, आशिष नायकुडे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत झाले. प्रवेश प्रक्रियेची माहिती डॉ. संजय कदम यांनी दिली. त्यांनी विविध शाखांमधील प्रवेशाचे निकष, प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन प्रवेश पद्धती, सरकारच्या आरक्षण धोरणाची माहिती तसेच शिष्यवृत्ती व आर्थिक मदतीच्या योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांचे शंका समाधान केले.

प्रा. खडके यांनी ‘बिझनेस व टेक्निकल स्किल्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की केवळ शैक्षणिक पात्रता असून चालत नाही, तर विद्यार्थ्यांनी व्यवहारज्ञान आणि तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. या कौशल्यांच्या माध्यमातून केवळ नोकरी मिळवता येते असे नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना नोकरी देण्याची संधी देखील मिळते. स्वयंरोजगाराच्या आणि स्टार्टअप्सच्या दृष्टीने या कौशल्यांचा उपयोग कसा करता येतो, याचे त्यांनी स्पष्ट उदाहरणांसह विवेचन केले.

प्रा. येडे यांनी दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शाखांचा स्कोप विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांनी सांगितले की प्रत्येक शाखेची गरज आणि मागणी वेळोवेळी बदलत असते, त्यामुळे कोणत्याही शाखेची निवड करताना केवळ आकर्षणापेक्षा स्वतःची आवड, क्षमता आणि त्या शाखेतील भविष्यातील संधी यांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांनी सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आदी शाखांमधील करिअरच्या वाटा, उच्च शिक्षणाची दिशा आणि रोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी योग्य माहितीच्या आधारे सचोटीने निर्णय घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

प्रा. केळकर यांनी डिप्लोमा इंजिनिअर्ससाठी औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, देखभाल व दुरुस्ती, ऑटोमेशन, प्रकल्प व्यवस्थापन अशा अनेक विभागांमध्ये डिप्लोमा धारकांची मागणी सतत वाढत असल्याचे सांगितले. डिप्लोमा केल्यानंतर थेट नोकरी मिळवण्याबरोबरच पुढील शिक्षणासाठी भरपूर संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी ‘डिप्लोमा हा एक स्टेपिंग स्टोन आहे’ असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले आणि मजबूत पाया घालण्यासाठी डिप्लोमा शिक्षणाचा उपयोग कसा करावा, हे उदाहरणांसह समजावून सांगितले.

डॉ. एन. बी. पासलकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून ‘एक इंजिनिअर हा नोकरी शोधणारा नव्हे, तर नोकरी निर्माण करणारा असावा’ हा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी सांगितले की आधुनिक युगात केवळ नोकरीसाठी शिक्षण घेणे पुरेसे नाही, तर नवीन कल्पना, कौशल्ये आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करून स्वतःचा व्यवसाय उभारणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी टेक्निकल एज्युकेशनचे तीन महत्त्वाचे टप्पे : डिप्लोमा, डिग्री आणि स्पेशलायझेशन याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच योग्य कॉलेजची निवड करताना प्रशिक्षित आणि अनुभवी शिक्षकवर्ग, प्रयोगशाळांची उपलब्धता, ग्रंथालय, इंडस्ट्रियल टायअप्स, प्लेसमेंट सुविधा आदी घटकांचा विचार करावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

आशिष नायकुडे यांनी आपल्या मनोगतात विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या कार्यप्रणालीचे व गुणवत्ता शिक्षणाचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, महाविद्यालयाची शिस्तबद्ध व्यवस्था, अनुभवी प्राध्यापकवर्ग, अद्ययावत प्रयोगशाळा व औद्योगिक प्रशिक्षणाची उपलब्धता ही या संस्थेची खास वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यावहारिक कौशल्ये व उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणारे हे कॉलेज उत्कृष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमादरम्यान इंदापूर तालुक्यातील व परिसरातील शाळांमधील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनत आणि यशाची दखल घेण्यासाठी हा सन्मान महत्त्वाचा ठरला. या कार्यक्रमास 300 पेक्षा जास्त विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सोमनाथ चिकणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *