सोलापूर : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याला आणून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यायासाठी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन जल, कृषी, धार्मिक व विनयार्ड पर्यटनाच्या अनुषंगाने विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून सुमारे 250 कोटीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला आहे. त्यास मान्यता देण्यात येत असून यावर्षीच्या अंदाजपत्रकात निधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध राहील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मान्यतेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार संजयमामा शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण या आराखड्याला मान्यता देत असून यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य सरकार उपलब्ध करून देईल, त्याबाबतचा मागणी प्रस्ताव तात्काळ सादर करावा व याच अधिवेशनातील अंदाजपत्रकात या आराखड्यासाठी टोकन निधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या आराखड्यातील सोयी सुविधा जागतिक दर्जाच्या निर्माण करण्यात येणार असल्याने अशा सुविधा देणाऱ्या संस्थांची निवड करावी. या प्रस्तावित केलेली सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची होऊन देश विदेशातील पर्यटकांना समाधानकारक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याच अनुषंगाने स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ निर्माण असल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याने हा पर्यटन आराखडा खूपच महत्वपूर्ण असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्राथमिक स्तरावर जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी त्यांनी या अंदाजपत्रकात तरतूद केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. आज आपल्याकडून या आराखड्यास मान्यता मिळाल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आजच राज्य सरकारला आराखडा सादर करण्यात येईल. उजनी धरणात जल पर्यटन, 94 धार्मिकस्थळे असल्याने धार्मिक पर्यटन, कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने कृषी पर्यटन तसेच विनयार्ड पर्यटन विकसित होण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्यास जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास होऊन येथे देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन स्थानिक नागरिकांची आर्थिक उन्नती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना खूप महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा रेल्वे व रस्त्याने जोडलेला आहे. हा जिल्हा मंदिराचा जिल्हा असून येथे 94 पर्यटन स्थळे आहेत. उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून येथे अक्वॉटिक टुरिझम तसेच वॉटर स्पोर्ट टुरिझम मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकते. उजनी धरणाचे 90 किलोमीटरचे पात्र असून पात्राची रुंदी जवळपास सहा किलोमीटर आहे. येथे पर्यटकांना गोड्या पाण्याचा समुद्र अनुभवयला मिळणार आहे. तसेच या ठिकाणी देशातील सर्वात मोठा जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठे पॅव्हेलियन निर्माण करण्यात येऊन यात माहिती, तिकीट केंद्र व प्रतीक्षलाय उभारण्यात येणार आहे. मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, 1 हजार क्षमतेचे मोठे सभागृह, बोर्ड रूम, रॉक पुल, सर्व वयोगटासाठी भारतातील सर्वात मोठा जलतरण तलाव, वॉटर फ्रंट डेक, लाईट हाऊस, बोट रॅम्प, मरीना बोट पार्किंग, वॉटर स्पोर्ट्स, फ्लाईंग वॉटर बोर्ड, बोट सफारी, क्रुझ सफारी, अक्वेटिक लाईफ यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे आशीर्वाद यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा हा धार्मिक पर्यटनात ही अग्रेसर असून पंढरपुरचे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूर येथे येत असतात. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर व कुडल- हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिर, बार्शीतील भगवंत मंदिर यांचा ही धार्मिक पर्यटनस्थळ अंतर्गत विकास केला जात असून या ठिकाणी येणारे भाविकांची संख्या ही मोठी आहे. त्याप्रमाणेच उजनी धरण परिसर व जिल्ह्यात कृषी पर्यटनाचा लाभ घेता येऊ शकतो. यासाठी होम स्टे बैलगाडी सफारी, बफेलो राईड, स्थानिक व पारंपारिक सण साजरे करणे, लोककला, मासेमारी सह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येतील. माळशिरस व करमाळा परिसरात विनयार्ड पर्यटन निर्माण केले जाऊ शकते. यामध्ये विन यार्ड, मनोरंजन, बायसिकल राईड, चीज टेस्टिंग, हॉटेल्स या सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

उजनीच्या सर्वेक्षणास 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. कृषी व विनयार्ड आराखडा 30 जुलैला तयार होईल. प्रकल्प अहवाल व अंतिम सादरीकरण 15 ऑगस्टला होणार आहे व त्यानंतर राज्य शिखर समिती ची मान्यता मिळून पुढील सहा महिन्याच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार शिंदे यांच्यामुळे पर्यटन आराखड्याला गती
जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करणे व त्या अनुषंगाने सर्व बाबींची पूर्तता करणे या कामास मागील दहा वर्षांपूर्वी सुरुवात झालेली होती परंतु काही कारणामुळे हा आराखडा मार्गी लागत नव्हता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जुलै 2023 मध्ये जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पर्यटन आराखडा कामास गती आली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहून त्यादृष्टीने पर्यटन विकास आराखड्यात महत्त्वपूर्ण चार घटक अंतर्भूत केले व त्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावर अभ्यास करून एक परिपूर्ण एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला. यासाठी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनीही पाठपुरावा केला.

पर्यटन प्रकल्प
सोलापूर जिल्हा हा भारतातील एकमेव असा जिल्हा आहे ज्या ठिकाणी जल, कृषी आणि ग्रामीण पर्यटन यांचे अनोखे मिश्रण आहे. उजनी धरण हा या पर्यटन आराखड्याचा केंद्रबिंदू आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देशी विदेशी पर्यटकांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. या ठिकाणी विविध व्यवसायांची निर्मिती होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळवून येथील ग्रामीण जीवनमान यांच्यात बदल घडवून त्यांची आर्थिक उन्नती साधली जाणार आहे येथील लोकांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत कायमस्वरूपी उपलब्ध होणार असल्याने हा पर्यटन प्रकल्प होणे अत्यंत आवश्यक आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *