करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘शेतकऱ्यांना कालव्यातून पाणी देताना दुर्लक्ष करू नका. त्यांच्या अडचणी सोडवा’ असे अधिकाऱ्यांना सुनावत ‘सर्व लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळेल’, असे नियोजन करण्याची सूचना आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.
करंजेला जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक पूल तत्काळ दुरुस्त करण्याची फुकेंची आमदार पाटील यांच्याकडे मागणी
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर, सोलापूर पाटबंधारे विभाग, करमाळा पाटबंधारे उपविभाग व मांगी मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समितीची पोथरे येथील आंनदी मंगल कार्यालयात आमदार पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, करमाळा उपविभागीय अभियंता प्रकाश बाबा, आदिनाथचे संचालक डॉ. हरिदास केवारे, रविकिरण फुके, पंचायत समितीचे सदस्य स्वप्नील काळे, विठ्ठल सावंत, ईश्वर पाटील, दादा शिंदे, बाळासाहेब ठोंबरे, सचिन वाघमोडे यांच्यासह मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीवेळी शनैश्वर पाणी वाटप संस्था, पांडुरंग पाणी वापर संस्था, कमलादेवी पाणी वाटप संस्था, आदिनाथ पाणी वाटप संस्थाचे पदाधिकाऱ्यांसह मांगी, वडगाव, पुनवर, पोथरे, बिटरगाव श्री, करंजे, निलज, धायखिंडी आदी गावातील शेतकरी उपस्थित होते. सुरुवातीला शेतकऱ्यांनी सूचना मांडल्या. त्यात पाणी वाटप व पाणीपट्टी याबाबतची तापवत मांडण्यात आली. अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबतही तक्रारी करण्यात आल्या. बिटरगाव श्री येथील सायपण व पोटेगाव बंधारा याबाबतही प्रश्न शेतकऱ्यांनी मांडले. आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांनी मांडलेल्या सूचना आणि तक्रारी गांभीर्याने घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणी वाटपात कोणतीही अडचण येणार नाही असे नियोजन करण्याची सूचना केली.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी शेतकऱ्यांना पाणीपट्टी वेळेवर भरण्याचे आवाहन केले. ‘तलावातील पाणी कसं कमी होत आहे याची अपडेट देत चला, कार्यालयात वेळेवर थांबा आणि शेतकऱ्यांना चांगली सेवा द्या’, असे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले. ‘शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या सायपनची पहाणी करा आणि तत्काळ उपाययोजना करा असे सांगतानाच आऊटलेटचा अहवालही पाठवण्यास सांगितले आहे. यावेळी शाखाधिकारी अरुण कांबळे, कालवा निरीक्षक संदीप पवार, अतुल दाभाडे, श्रीनिवास पुराणिक आदी उपस्थित होते.
