करमाळा (अशोक मुरूमकर) : जेऊर येथे एका संस्थेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचा तपास ‘सीआयडी’कडे देण्यात यावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. सबंधित गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांवरही त्यांनी गंभीर आरोप केले असून तपास अधिकारी बदलण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

जेऊर येथील एका संस्थेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीने जानेवारीमध्ये गळपास लावून आत्महत्या केली होती. मात्र त्यानंतर हा तपास योग्य झाला नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे. याप्रकरणाचा सखोल आणि पारदर्शी तपास व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या देसाई आज (बुधवार) करमाळ्यात आल्या होत्या. त्यांनी पोलिस निरीक्षक रणजीत माने व तपास अधिकारी गिरिजा मस्के यांची कार्यकर्त्यांसह भेट घेतली. करमाळा पोलिस ठाण्यात साधारण पाऊणतास त्यांनी माने यांच्याशी संवाद साधून माध्यमांशी संवाद साधला.
देसाई म्हणाल्या, जेऊर येथील प्रकरण गंभीर आहे. जानेवारीत संबंधित पीडित विद्यार्थिनीने गळपास घेऊन आत्महत्या केली. या पीडितेने आत्महत्या केली तेव्हा सुसाईट नोट अथवा ज्या दोरी/ ओडणीने गळपास घेतला ते घटनास्थळी आढळून आले का? या प्रकरणात राजकीय दबाव व अर्थपूर्ण व्यवहवार होत असल्याने योग्य पद्धतीने तपास होत नाही, असा आरोप करण्यात आला आहे. सबंधित संस्थेतील काही शिक्षकही सबंधित विद्यार्थिनीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे बोलले जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात मोठी तडजोड झाली असल्याची चर्चा असून याचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान या गुन्ह्याचा योग्यरीतीने तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक माने यांनी सांगितले आहे. पोस्कोमुळे खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
