सोलापूर : जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये योग्य तो बदल करावा. वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. समीर बोरकर यांनी सांगितले आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्याअनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ च्या नियम ९६ मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण तथा भारतीय प्राणी कल्याण मंडळ व केंद्र सरकारने प्राधिकृत केलेल्या अधिकारी वा व्यक्ती वा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे, असे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदाराने नकार देणे अपेक्षित आहे.
प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६०, प्राण्यांच्या वाहतूकीचे नियम १९७८ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केल्याशिवाय जनावरांची वाहतूक करण्यात येऊ नये. या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. समीर बोरकर यांनी आवाहन केले आहे.