करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणासाठी लढा उभा केलेले मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील ३९ गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने हे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश मंगवडे, प्रा. राजेश गायकवाड उपस्थित होते.
प्रा. झोळ म्हणाले, वृक्ष हे मानवाला सावली, प्राणवायु, फळे देतात. जीवनामध्ये वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मराठा समाजाला असेच मायेची सावली देऊन, सर्व सरकारच्या वादळाला सामोरे जाऊन खंबीरपणे उभे राहून, अनेकांना कुणबी दाखले मिळवून देऊन, त्यांच्या जीवनाचे सोने करून वटवृक्षप्रमाणे त्यांचा आधारवड बनण्याचे काम मनोज जरांगे यांनी केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ५८ मुक मोर्चे निघाले तरीही मराठा समाजाला न्याय मिळाला नव्हता. आता मनोज जरांगे यांचे प्रामाणिक निस्वार्थी खंबीर नेतृत्व मिळाल्यामुळे मराठा समाजाला आता न्याय मिळण्यास सुरुवात झाली आहे. ७ ॲागस्टला सोलापूर येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी मराठा समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.