करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्यातील सहकाराचे मंदिर असून हे मंदिर वाचविण्यासाठी आदिनाथची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्व मानणारे करमाळा तालुक्यात राजकीय गट आहेत. तेव्हा संचालक मंडळ निवडीचे सर्वाधिकार त्यांना देण्यात यावेत तरच कारखाना सुरळीत चालेल, असे आदिनाथचे माजी अध्यक्ष माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले आहे.
आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप म्हणाले, ‘यापूर्वी निवडून दिलेले संचालक मंडळ हे कारखाना सक्षमपणे चालवण्यास अपयशी ठरलेले आहे. मकाईची देखील निवडणूक झाली पण कारखाना सुरू झाला का? यामुळेच मी यापूर्वी जाहीर व स्पष्टपणे आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोला चालवायला द्या अन्यथा ब्रह्मदेव आला तरी आदिनाथ चालू होणार नाही असे सांगितले होते.
माजी आमदार जगताप म्हणाले, ‘श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून ज्यांनी सर्वाधिक सत्ता कारखान्यावर भोगली त्यांनी आदिनाथच्या नुकसानाची जबाबदारी घ्यावी. आदिनाथ बंद असतानाही व कारखान्यावर प्रशासकीय कारभार सुरु असताना गैरव्यहावर झाला. आदिनाथचा सभासद मात्र प्रचंड दुर्लक्षित झाला असून सभासदांच्या थंड, सोशिक व मरणासन्न भूमिकेमुळे त्यांच्यावर ही वेळ आल्याचे देखील जगताप यांनी स्पष्टपणे सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आदिनाथच्या सभासदांनीआतापर्यंत कारखान्यावर कोणी कसा कारभार केला या सर्व सत्ताधाऱ्यांच्या, गटांच्या व सर्व चेअरमन यांच्या कारभाराचे डोळसपणे तुलनात्मक दृष्ट्या अवलोकन करून विचार करावा व आदिनाथच्या भवितव्याबाबत निर्णय घ्यावा. या कारखान्याचा अध्यक्ष असताना कशा पद्धतीने कारखाना चालवला जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस उत्पादकांना एक रुपया ज्यादा दर दिला. त्याचबरोबर आपल्या काळात राबवलेल्या टेंडर प्रक्रिया अनावश्यक खर्चाला दिलेला फाटा याचा संपूर्ण करमाळा तालुका साक्षीदार आहे.
करमाळा तालुक्याच्या आसपास प्रचंड गाळप क्षमता असलेले साखर कारखाने त्यांचे सुयोग्य नियोजन, आर्थिक सक्षमता, योग्य दर या सर्व स्पर्धेत आपला टिकाव लागणार का? कारखान्यावर असलेला कर्जाचा बोजा, कामगारांचे थकलेले पगार, वाहन मालक व ऊस उत्पादकांची देणे आगामी काळात कारखाना सुरू करण्यासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध होईल का? त्याची योग्य वेळेत परतफेड होईल का? कारखाना पूर्ण क्षमतेने चालवुन ऊस उत्पादकांना आसपासच्या खाजगी व सहकारी साखर कारखान्यांमध्ये प्रमाणे दर देणे शक्य होईल का? याचाही विचार करणे गरजेचे आहे. उसाचे क्षेत्र असतानाही केवळ गैरव्यवस्थापनामुळे आदिनाथ कारखाना बंद पडला, असा आरोपही त्यांनी केला आहे.