करमाळा (सोलापूर) : बागल गटाला राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी सातत्याने आतापर्यंत श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लक्ष्य केले गेले आहे. पुन्हा असा प्रकार आदिनाथच्या बाबतीत होऊ नये याकरता निवडणुकीसाठी बागल गटाने थांबण्याचा निर्णय घेतला असून बागल गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज दोन दिवसात माघारी घ्यावेत, असे आवाहन बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांनी केले आहे.
बागल गटाच्या संपर्क कार्यालयात आज (शनिवारी) प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष व शिवसेने (शिंदे गट) दिग्विजय बागल उपस्थित होते. लोकनेते माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांच्या प्रतिमा पूजनाने बैठक सुरु झाली. सोमनाथ पोटे व अंगद पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी आदिनाथच्या निवडणूकीबाबत विचार विनिमय करण्यात आले.
बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, माजी उपसभापती चिंतामणी जगताप, कल्याणराव सरडे, रणजीत शिंदे, अंगद पाटील, केरू गव्हाणे, ऍड. नानासाहेब शिंदे आदींनी विचार मांडले. यावेळी सर्वांनी एक मुखाने आदिनाथ निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार गटाच्या नेत्या व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल व मार्गदर्शक घुमरे यांना प्रदान केले. दिग्विजय बागल यांनी त्यांचा निर्णय मान्य करावा, असे आवाहन केले.
घुमरे म्हणाले, ‘वीस वर्षांमध्ये बागल गटाच्या राजकारणाला अडचणीत आणण्यासाठी आदिनाथ कारखान्याला अडचणीत आणून आदिनाथला लक्ष्य केले गेले आहे. कुठेतरी आता आदिनाथवर पुन्हा असा प्रकार होऊ नये आणि बागल गटाला राजकीय लक्ष करण्यासाठी आदिनाथ सुरु होऊ नये असा प्रयत्न होऊ नये त्यासाठी आम्ही या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही फक्त निवडणुकीपुरतं थांबलो आहोत आदिनाथ व्यवस्थित चालण्यासाठी आमचे योगदान सातत्याने असेल. जो कोणी आदिनाथच्या सत्तेवर येईल त्याला बागल गटाच्या वतीने सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.