करमाळा (सोलापूर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी भीमा- सीना जोडकालवा भागातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे उपस्थित होते. पुण्यात त्यांनी ही चर्चा केली आहे.
माजी आमदार शिंदे म्हणाले सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र या भागात वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतीचे नुकसान होणार आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. उजनीतून सिनेचे आवर्तन सुरु असताना वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे कंदर, सातोली, दहिवली, कव्हे, केम, पिंपरी, गवळेवाडी आदी भागात बोगदा व नदी काठाच्या पिकांवर याचा परिणाम होत आहे. पाणी असूनही पुरेशी वीज मिळत नसल्याने शेतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे माजी आमदार शिंदे यांनी केली आहे.