करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आदिनाथ कारखाना हे करमाळा तालुक्याचे वैभव आहे. हा बंद पडलेला कारखाना सुरु करण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मागे उभा राहिले पाहिजे,’ असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे यांनी केले आहे. ‘आदिनाथ कारखाना उभारणीपासून आतापर्यंत काय काय घडले?’ याबाबत माहिती सांगत विरोधकांची कानटोचणी करत सभेचे मैदान गाजवलं.
वीट येथे माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती आदिनाथ पॅनलची प्रचार सभा झाली. गलांडे म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यात आम्ही सहकारी संस्थांच्या प्रचार सभा ऐकतो. त्यात असतं रिकव्हरी कशी वाढेल, प्रोग्राम कसा राबविला पाहिजे, ऊस वाहतूक कशी केली जाईल? अशा कारखाना आणि शेतकरी हिताचे विषय चर्चिले जातात. मात्र आपला आदिनाथ १९९३ मध्ये सुरु झाला आणि बंद पडला. जेव्हा निष्क्रियता दिसते तेव्हा आरोप करून दिशा भरकटवली जाते. परंतु आता माजी आमदार शिंदे यांच्या सारखे सक्षम नेतृत्व कारखान्याच्या रिंगणात उतरले आहे. तेव्हा त्यांच्या पाठीशी सभासदाने उभा राहिले पाहिजे.’
पुढे बोलताना गलांडे म्हणाले, ‘गोविंदबापू यांनी हा कारखाना उभा केला. त्यांनी पायात चप्पल घातली नाही हा इतिहास आहे. त्यांच्या काळात ५५ हजार टन ऊस गाळप झाल्याचा इतिहास आहे. तेव्हा अनेक शेतकरी बाहेरच्या कारखान्याला ऊस जात होता. त्याच आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. २९ हजार सभासदांचा हा कारखाना आहे. २०१२ च्या निवडणुकीत आपण काय बोलत होतो हे आता आठवण्याची गरज आहे. तेव्हा राष्ट्रवादीचा पॅनल आला असे म्हणत मामांना दुर्गा हॉटेलमध्ये वाजत आणले होते. तेव्हा आबांचे सुद्धा संचालक मामांमुळे निवडून आणले होते. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही कायम राजकारण करत आला आहात’, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. मग आता मामा बाहेरचे का वाटतात? असाही प्रश्न त्यांनी विरोधकांना केला आहे.
गलांडे म्हणाले, ‘माजी आमदार शिंदे यांना संस्था चालवण्याचा अनुभव आहे. या निवडणुकीकडे फक्त राजकारण म्हणून पाहू नका. आपल्या जीवनमान उंचावण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. हा कारखाना उभा करण्यासाठी ज्यांनी आयुष्य घालवले त्यांचेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी माजी आमदार शिंदे यांना मतरूपाने बळ देणे आवश्यक आहे. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत यावेळी संचालकांची फुटाफूट होणार नाही असा विश्वास आहे. शिंदे यांना सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे मदत करतील असेही गलांडे म्हणाले आहेत.