करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आदिनाथ कारखाना हा आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे चालणार आहे. कारखाना चांगला सुरु झाला तर आपल्या उसाचा दर वाढणार आहे हा कारखाना म्हणजे आपले दैवत आहे. यामध्ये आपल्या भावना अडकलेल्या आहेत’, असे मत महेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.
वांगी येथे आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ संजीवनी पॅनलची सभा झाली. महेंद्र पाटील म्हणाले, ‘विरोधक सांगत आहेत आम्ही हा कारखाना चांगला चालवू पण त्यांनी स्वतःचाच कारखाना विकला आहे. हा कारखाना त्यांच्याकडे गेल्यानंतर हाहीही विकून टाकतील. हा आपल्या स्वतःचा आणि हक्काचा कारखाना आहे. हा कारखाना आमदार पाटील हे व्यवस्थित चालवणार आहेत.’
पुढे बोलताना महेंद्र पाटील म्हणाले, ‘आमदार नारायण पाटील यांनी या भागातील वीज व पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. ऊस आणि केळीचे उत्पन्न घेत आहोत. भविष्यात उसाची अडचण येऊ नये म्हणून आदिनाथ कारखाना चांगला सुरु होणे आवश्यक आहे. उजनीच्या पाण्यासाठी आमदार पाटील यांनी स्वतः मोर्चा काढला होता,’ असेही महेंद्र पाटील म्हणाले.
‘संजयमामा शिंदे हे आमदार होते तेव्हा जातेगाव टेंभुर्णी महामार्ग होणार याचे फलक लागले होते पण काम का झाले नाही’, असा प्रश्न त्यांनी केला आहे. ‘आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता पूर्ण होणार असून ते आमदार आहेत तोपर्यंत कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.