करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त करमाळामार्गे हजारो वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. पंढरपूरला दिंड्यांच्या माध्यमातून येणाऱ्या मनाच्या पालखीपैकी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी करमाळा येथून जाते. रविवारी (ता. २९) करमाळा तालुक्यात ही पालखी येणार असून याचे सर्व नियोजन झाले असून वारकऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे.
तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, ‘वारकऱ्यांसाठी कोणतीही उणीव राहणार नाही याचे नियोजन झाले आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी करमाळा तालुक्यात रावगाव, जेऊर व कंदर अशा तीन ठिकाणी मुक्कामी असणार आहे. यामध्ये असलेल्या महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षामध्ये सॅनिटरी पॅड वेंडर मशीन आणि ते डिस्पोज करण्यासाठी बर्निंग मशीन असणार आहेत.’
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी स्नानगृहे करण्यात आली आहेत. स्वच्छतागृहांची सोय करण्यात आलेली आहे तसेच सदरची स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी ज्या कंपनीला टेंडर देण्यात आलेले आहे त्याच्याशी पॉईंट संपर्क करून आवश्यक तेवढा कामगार वर्ग ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आरोग्यबाबत सर्व औषधे उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची तपासणी करून आणि गरज पडल्यास ती मागवण्याची आहेत. रावगाव येथे पाच, करमाळा येथे दहा व जेऊर येथे 10 अश्या राखीव खाटाची सोय केली आहे.’
‘पाणीपुरवठा सुरळीत होईल याकरता आलेले टँकर व आपण उपलब्ध करून दिलेले टँकर स्वच्छ पाणी भरतील आणि सदर पाणी निर्जंतुकीकरण केलेले असेल याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिलेली आहे. एमएससीबीला वीज पुरवठा खंडित होणार नाही तसेच ज्या लाईन्स टाकलेले आहेत त्या उघड्या राहून अपघात होणार नाहीत याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि ग्रामपंचायत यांनी रस्त्याच्याकडेला अडथळा करणारी झुडपे आणि काटेरी झाड याची चटणी करून साईड पट्ट्या स्वच्छ करून घ्यायचे आहेत. साईड पट्ट्या भरण्यासाठी लागणारा मुरूम संबंधित तलाठी आणि सर्कल यांनी तात्काळ उपलब्ध करून द्यायचा आहे. नगरपालिकेने विसावा आणि महाप्रसादाची ठिकाणी स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करून घेणं अत्यावश्यक आहे. नगरपालिकेने आपल्या हद्दीतील रस्ते खड्डे भरून दुरुस्त करून घ्यायचे आहेत. पोलिस प्रशासनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत बंदोबस्त द्यायचा आहे आणि बंदोबस्त इनचार्ज यांचा नंबर पालखी प्रमुखांना द्यायचा आहे’, अशा सर्व सूचना देण्यात आल्या असून याची व्यवस्था करण्यात आल्याचे तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले आहे.