करमाळा (अशोक मुरूमकर) : नागरिकांची कामे तत्काळ व सुलभतेनी व्हावीत यासाठी महसूल विभागाकडून ७ ते १५ मार्च दरम्यान ‘महाराजस्व अभियान’ राबविण्यात येणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने करमाळा तहसील कार्यालयाच्या वतीने ११ मंडळात हे अभियान राबविले जाणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, ‘महाराजस्व अभियान’मध्ये सर्व विभागाचे अधिकारी नागरिकांची कामे तत्काळ करणार आहेत. गावपातळीवर त्यांना यामध्ये सेवा दिली जाणार आहे. यामुळे शासकीय कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहे. याशिवाय वेळ व पैशाचीही बचत होणार आहे. यामध्ये सातबारा दुरुस्ती, वारस नोंद करणे, पोटखराब क्षेत्र तुकडेबंदी क्षेत्रातील तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत. रेशन कार्डमधील नाव कमी करणे व वाढवणे अशी अनेक कामे यामध्ये केली जाणार आहेत, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी तहसीलदार ठोकडे यांनी केले आहे.
