करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘दहिगाव उपसासिंचन योजनेच्या बंदनलिकेचे काम माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीत सरकार नियमानुसार झाले होते. माझ्या काळात याला कोणीही विरोध केला नाही. पाचच महिन्यात फक्त चांगल्या कामाला विरोध करायचा म्हणून पाईप जाळले जात आहेत. यामागे खरे कारण काय? हे समोर आले पाहिजे,’ असे स्पष्टीकरण देत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आमदार नारायण पाटील यांना प्रश्न केला आहे.
तालुक्यातील दहिगाव उपसासिंचन योजना ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. सरकार धोरणानुसार या योजनेचे बंदनलिकेचे काम सुरु आहे. माजी आमदार शिंदे यांच्या काळात हे काम सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाला आणि त्यांचे प्रतिस्पर्धी पाटील विजयी झाले. या योजनेचे निवडणूक झाल्यापासून दोनवेळा पाईप जाळण्यात आले आहेत. त्यामुळे पाटील व शिंदे यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत.
आमदार पाटील यांनी ‘आमच्या कार्यकर्त्यांनी हे पाईप जाळले नाहीत. मात्र बंदनलिकेला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे’ सांगत माजी आमदार शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर माजी आमदार शिंदे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना प्रतिक्रिया देत पाटील यांना प्रश्न केला आहे.
माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘दहिगाव उपसासिंचन योजना ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची योजना आहे. माझ्या काळात सर्वात जास्त पाणी देण्याचा मी प्रयत्न केला. सरकार धोरणानुसार हे याच्या बंदनलिकेच्या कामासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामामुळे लाभक्षेत्रातील गावे वाढण्यास मदत होणार आहे. तसा प्रस्ताव सरकारकडे आहे. पाण्याची चोरी व पाणी बचत होऊन शेतीलाच त्याचा फायदा होणार आहे. माजी आमदार जगताप यांच्याच उपस्थितीत हे काम सुरु झाले. तेव्हा कोणीही विरोध केला नाही. आता विरोध नेमका का केला जात आहे? याचे खरे कारण शेतकऱ्यांना सांगणे गरजेचे आहे.’
पुढे बोलताना माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘मी फक्त विकासाचे राजकारण केले आहे. कोणतेही कोणाचे काम हाणून पाडले नाही. राजकारणासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. पाईप जाळणारे नेमके कोणाचे कार्यकर्ते आहेत? पोलिसांनी याचा योग्य तपास करावा.’
सामाईक जमिनीतील बांबूची झाडे का तोडली विचारले म्हणून मोठ्या भावाकडून मोरवडमध्ये मारहाण