एकनाथ शिंदे व तानाजी सावंत यांनी बळ देऊनही तुम्हाला आदिनाथ व्यवस्थित चालवता आला नाही : शिंदेंचा पाटील यांना टोला

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आदिनाथ कारखाना सुरु करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळ दिले होते. तेव्हा त्यांच्या हस्ते मोळीही टाकण्यात आली मात्र तुम्ही केवळ आमदारकीसाठी तेथे राजकारण करून पुन्हा आदिनाथ कारखाना अडचणीत आणला. आता पुन्हा कारखाना सुरु करण्याचे खोटे आश्वासन देत आहात. हा कारखाना माझ्या ताब्यात आला तर सुरळीत सुरु होईल आणि तुमच्या राजकारणावर परिणाम होईल म्हणून तुम्ही मतदारांची दिशाभूल करत आहात’ असा आरोप माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केला आहे.

साडे येथे माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती आदिनाथ बचाव पॅनलची सभा झाली. माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘आदिनाथ कारखान्याचा मी सभासद आहे. कंदर येथे माझी शेती आहे. केवळ तुमच्या निष्क्रियतेमुळे अस्मितेचा विषय करत आहात. करमाळा विधानसभा मतदारसंघात माझे गाव आहे. आदिनाथ कारखान्याचा मी सभासद आहे. मी कारखाना सुरु केला तर तुमच्या राजकारणावर परिणाम होईल म्हणून दिशाभूल केली जात आहे. हा कारखाना म्हणजे माझ्याही अस्मितेचा विषय आहे.’

पुढे बोलताना माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘केवळ राजकारण म्हणून या कारखान्याकडे न पहाता शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांचे प्रश्न सुटणे आवश्यक आहे. माझ्या ताब्यात हा कारखाना आला तर सर्व प्रश्न सोडवणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी या कारखान्याची मोळी टाकली होती. मग तरीही तुम्ही कारखाना अडचणीतून का बाहेर काढला नाही’, असा प्रश्न यावेळी माजी आमदार शिंदे यांनी आमदार पाटील यांना केला आहे. माजी आमदार शिंदे हे दहिगाव उपसासिंचन योजना व रिटेवाडी (कुकडी- उजनी) उपसासिंचन योजनेवरही बोलले. ‘ज्यांनी दोन कारखाने विकेल त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करता आणि आदिनाथच्या माध्यमातून राजकारण करत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहात’, असेही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *