करमाळा (अशोक मुरूमकर) : आदिनाथला संजीवनी देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. हा कारखाना व्यवस्थित चालला तर कामगारांसह सर्वांचे प्रश्न सुटणार आहेत. त्यासाठी आपण पैसेही उपलब्ध करणार आहे, असे आमदार नारायण पाटील म्हणाले.
वीट येथे श्री आदिनाथ संजीवनी पॅनलच्या प्रचारसभेत आमदार पाटील बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना डबघाईला गेलेला आहे. या कारखान्यातील कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिनाथ कारखान्यात आतापर्यंत अनेक अध्यक्ष व उपाध्यक्ष झाले आहेत. ज्यांच्याकडे हा कारखाना गेला त्यांनी कारखान्याचे हीत न पहाता स्वतःचे हीत पाहिले. कारखाना उभारणीत गोविंदबापू पाटील यांचा मोठा वाटा होता. त्यात विनायक घाडगे, रावसाहेब पाटील, पानाचंद गांधी, गिरिधरदास देवी यांचाही सहभाग होता.’
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आता तेथे कामगारांच्या कुटुंबियांना पाणीही तेथे नाही. गोविंदबापू पाटील यांनी या कारखान्यासाठी किती कष्ट केले आहेत याची माहिती आम्हाला आहे. त्यांनी यासाठी मोठा त्याग केला. २२ वर्ष त्यांनी पायात चप्पल घातली नाही. त्यांनी आमच्या कुटुंबीयांचा विचार केला नाही. फक्त कारखाना उभा करायचा एवढेच त्यांचे लक्ष होते. शरद पवार यांनी यासाठी मदत केली. हा कारखाना माझ्या ताब्यात सभासदांनी दिला तर व्यवस्थित चालवणार आहे. त्याला उर्जित अवस्था आणण्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. कारखान्यासाठी पैसे कसे आणायचे हे माझ्यावर सोडा,’ असे आमदार पाटील म्हणाले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘आदिनाथसाठी मी पैसे उपलब्ध करणार आहे. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यासाठी मी कोणाचेही पाय धरायला तयार आहे. हा कारखाना सुरु झाला तर सर्वांचे प्रश्न सुटणार आहेत. मला कोणी नावे ठेवली आणि काय बोलले याकडे लक्ष देणारही नाही. जेव्हा लक्ष देईल तेव्हा कोणाला सोडणारही नाही,’ असे म्हणत टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी इशाराही दिला आहे. माझ्यावर कोण टीका करत असेल तरी मी टीका करणार नाही’, असेही ते म्हणाले आहेत.
‘रिटेवाडी उपसासिंचन योजनेचा मी जनक आहे हे सर्वांना माहित आहे. या भागातील शेतीला पाणी आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे. दहिगाव उपसासिंचन योजनाही मी चांगल्यापद्धतीने चालवत आहे.’, असे आमदार पाटील म्हणाले.