करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे हस्तांतरण रोखून आमदार नारायण पाटील यांनी नुकसान केले, असा आरोप करत हा कारखान्याच्या इतिहासातील काळा दिवस होता, असे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे म्हणाले आहेत.
संगोबा येथे महायुती आदिनाथ बचाव पॅनलचा प्रचार शुभारंभ झाला. यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे, नागनाथ चिवटे, महेश चिवटे, उद्धव माळी, निळकंठ अभंग, श्रीराम फलफले, संतोष जाधव पाटील, वामनदादा बदे, जामखेड तालुक्यातील कवडगावचे माजी सरपंच मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथचे माजी संचालक किसन ढवळे होते.
गुळवे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकी वेळी मी शरद पवार यांच्या पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षाचे काम करत नारायण पाटील यांना माझ्या गावासह परिसरातून मताधिक्य दिले ते राजकारण वेगळं होते. आता आदिनाथ कारखाना चालवायचा असेल तर तो चालवण्याची क्षमता फक्त माजी आमदार शिंदे यांच्यामध्येच आहे. त्यामुळे कारखाना सक्षम व्यक्तीच्या हातात यावा या प्रामाणिक उद्देशानेच महायुतीच्या पॅनलच्या पाठीशी आपण उभे आहोत.
सुजित बागल, विवेक येवले, ऍड. अजित विघ्ने, राजेंद्र बाबर, भरत अवताडे, नंदकुमार जगताप, महेश चिवटे यांनी यावेळी मनोगते व्यक्त केले. चिवटे म्हणाले, ‘महायुतीच आदिनाथ कारखान्याला उर्जित अवस्था देऊ शकते. आदिनाथच्या हितासाठी शिंदेंची क्षमता पाहून शिंदे यांची शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी अशी ही महायुती व शरद पवार यांच्या पक्षाचे सुभाष गुळवे यांच्या सहकार्याने निश्चितच विजय संपादन करणार आहे.’