Karmala Politics ‘नारायण पाटलांच्या काळात स्थिर सरकार होते माझ्या काळात पाच वर्ष अस्थिर सरकार तरीही कामाची तुलना करा’ म्हणत मामांचे आबांना आव्हान

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘नारायण पाटील यांच्या काळात २०१४ ते १९ मध्ये पाच वर्ष स्थिर सरकार होते. तुमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चांगले संबंधीही होते मग त्यांनी काय काम केले?’ असा प्रश्न करत आमदार संजयमामा शिंदे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांना आवाहन करत माझ्या काळात किती सत्तांतरे झाले हे तुम्ही पहिले तरीही मी विकास कामांसाठी निधी आणला आणि कामे केली आहेत, असे आमदार शिंदे म्हणाले आहेत.

करमाळा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शिंदे यांचा माढा तालुक्यातील ३६ गावात प्रचार दौरा सुरु आहे. त्यात ते बोलत होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘आपण अपक्ष लढणार आहोत. चिन्ह कोणते मिळेल याचा विचार करू नका. विकास कामाच्या जोरावर मी निवडणुकीत उतरत आहे. मतदारसंघातील असं एकही गाव नाही की त्या गावात मी निधी दिलेला नाही.’

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राजकारण करताना मी विकासाची कामे केली आहेत. करमाळा तालुक्यात काही गावे अशी आहेत तेथे पहिल्यांदाच मी निधी दिलेला आहे. विरोधक म्हणत आहेत ३६ गावात त्यांची मते कमी होतील पण हे वातावरण पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसेल. करमाळा तालुक्यात प्रत्येक गावात आपला गट तयार झाला आहे. गेल्यावेळीपेक्षा यंदा तेथे आपल्याला जादा मत मिळतील आणि येथेही मते वाढणार आहे. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही.’ ‘सोशल मीडियावर काही विरोधक वेगळी चर्चा करत आहेत. केलेल्या कामाची कधी चर्चा केली जाते का? सोशल मीडियाचा चांगलाही वापर करता येतो’, असेही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *