राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार : महादेव जानकर यांची घोषणा

Rashtriya Samaj Party will fight on its own in the state Mahadev Jankar announcement

पुणे : राज्यात आज भाजपने मित्रपक्ष फोडले. पण काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी पण छोट्या पक्षांना खाण्याचच काम केलं.ज्यांना आम्ही सत्तेत बसवलं त्यानां खाली खेचायची ताकद देखील आमच्यात आहे, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला. तसेच स्वतःच घर मजबूत करा अन् रासपचं सरकार आणा, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसुराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज पुण्यात झाला. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचा 20 वा वर्धापन दिन गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा करण्यात आला. यावेळी देशाभातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना माहादेव जानकर बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष एस एल अक्की सागर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने,पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजित पाटील, अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष गणेश लोंढे, जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर यांच्यासह रासाप चे दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिनाडू, गुजरात, राजस्थान सह देशभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, या क्षणाला राष्ट्रीय समाज पक्ष मोठा कसा करायचा आणि रासपची दिल्ली आणि राज्यात शासन कसं येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वीस वर्षाच्या कार्यकाळात रासापने 4 आमदार, 95 जिल्हा परिषद सदस्य, बेंगलोर, आसाम गुजरातमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. टप्पा टप्प्याने आमची प्रगती चालू आहे. त्यामुळे आम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाहीये. आगामी लोकसभा निवडणुकीच्या देशातील 543 जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत, याचा पुनरुच्चार केला. तसेच मिर्झापूर (उत्तर प्रदेश), परभणी, माढा, बारामती यापैकी एका ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करताना सर्व जातीच्या आणि समाजाच्या लोकांना सोबत घ्या असे सांगत सत्तेत आल्यानंतर सर्वाँना समान वाटा देऊ असेही जानकर यांनी सांगितले.

आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले, परभणी जिल्ह्यात आमचे संख्याबळ आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर आम्ही नक्कीच रासपचा झेंडा नक्की फडकवू. त्यामुळे परभणीत आम्ही कोणासोबत युती करणार नाही. तसेच जानकर परभणीतून लोकसभा लढले तर आपण पूर्ण ताकद लावू आणि त्यांना लोकसभेत पाठवू असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *