करमाळा (सोलापूर) : वाढत्या उन्हामुळे राज्यभरात सकाळ सत्रातील शाळा साडेआकरा पर्यंतच सुरू राहणार आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात दुपारी साडेबारापर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून युवासेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी शिक्षण विभागाकडे हा निर्णय न बदल्याची मागणी केली आहे.
फेब्रुवारीतच उन्हाच्या तिव्रझळा बसू लागल्या आहेत अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी एक ते दिड किलोमीटर पायपीठ करावी लागते. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषदच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात (७\३० ते ११\३०) भरावाव्यात यासाठी शाळा व्यवस्थापन समीतीने ठराव दिले होते. युवासेनेकडुन देखील या मागणीस प्रसिद्धी पत्रक काढून पाठिंबा देण्यात आला होता. मात्र जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून सकाळी ७\३० ते दु १२\३० पर्यंत शाळा भरवण्याचे आदेश आल्याने पालक चिंतेत आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता शिक्षण विभागाकडून या निर्णयाचा फेर विचार व्हावा, अशी मागणी पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हिवरे येथील किरण मगर म्हणाले, शाळेपासून आमचे घर एक किलोमीटर आहे. शाळेत जाण्यासाठी मुलांना पायी जावे लागत आहे. दुपारी साडेबाराला शाळा सुटली तर मुलांना भर उन्हात पायपीठ करावी लागणार आहे. साडे आकराला शाळा सुटली तर बारापर्यंत मुलं घरी येवू शकतात.
उमरड येथील शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष संजय कोठावळे म्हणाले, उन्हामुळे सकाळच्या सत्रात भरवा अशी मागणी होती मात्र दुपारी साडेआकराला सोडा ही प्रमुख मागणी आहे. मात्र दुपारी साडेबाराला शाळा सोडणे म्हणजे वाडी वस्तीवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जोखमेचे आहे. या निर्णयामुळे उन्हापासून सरंक्षण होणे तर लांबच पण उन्हाचा फटका बसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे. त्यामुळेच शिक्षण विभागाचा निर्णय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशातला प्रकार.