करमाळा (सोलापूर) : उजनीच्या पाण्यासाठी उजनी धरणग्रस्त समितीच्या वतीने गुरुवारी (1 फेब्रुवारी) भिगवण (ता. इंदापूर) येथे सागर हाॅटेल समोर सकाळी 11 वाजता सोलापूर- पुणे हा राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात येणार आहे. यावेळी करमाळा, इंदापूर, कर्जत व दौंड तालुक्यातील धरणग्रस्त नागरिक एकत्रीत करणार आहेत. हा रास्ता रोको यशस्वी करण्याच्या पार्श्वभूमीवर उजनी जलाशय काठावरील नागरिक गावोगावी बैठका घेऊन भिगवणला जाण्याचे नियोजन करत आहेत. यातूनच वांगी नं 1 येथे सायंकाळी ५ वाजता नियोजन बैठक झाली.

या बैठकीत वांगी परिसरातील ढोकरी, भिवरवाडी, बिटरगाव, वांगी नं 1, 3, 4, नरसोबावाडी, पांगरे आदी गावातून जाण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीस उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर, उपाध्यक्ष भारत साळुंके, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, मकाईचे संचालक सचिन पिसाळ, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, वांगी ग्रामपंचायतीचे सदस्य दत्ताबापू देशमुख, तानाजी देशमुख, सोसायटीचे संचालक विकास पाटील, सुधीर देशमुख, रावसाहेब देशमुख, देवा तळेकर, नवा शिनगारे, शिवाजी खरात, भारत सलगर, गणेश खरात, विष्णुपंत वाघमारे, बाळू महानवर, दादा भोसले, आबा सरडे, वैभव पाटील, गणेश पाटील, भारत रोकडे, चंद्रकांत देशमुख आदी उपस्थित होते.
