पाणी पुरवठा विभाग प्रमुख निलंबन व दहीगावबाबतचा ठराव! गटविकास अधिकारी, भूमी अभिलेख, मुख्याधिकाऱ्यांचा बचाव; ग्रामसडक योजनेला खुलासा करण्याची सूचना

करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा पंचायत समितीची काल (शुक्रवारी) अथर्व मंगल कार्यालय येथे १० वर्षाने आमसभा झाली. यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागचे विभाग प्रमुख शेख यांच्या कामात हलगर्जीपणा दिसल्याने आमदार पाटील यांनी स्वतः त्यांच्या निलंबनाचा ठराव मांडला. त्याला गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी सहमती दिली. तर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी तालुका आपत्ती निवारण समितीच्या अध्यक्ष म्हणून त्यांच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र देणार असल्याचे सांगितले. भूमिअभिलेख व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या विभागाबाबत अनेक तक्रारी असल्याचे चर्चा केली जात होती. मात्र सभेवेळी त्यांनी प्रश्न विचारणाऱ्यांचा आक्रमकपणा दिसला नाही. त्यांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. एसटी महामंडळालाही धारेवर धरण्याचा प्रयत्न झाला. गटविकास अधिकारी डॉ. कदम यांच्याविरुद्ध माजी सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांना सपशेल बगल देण्यात आल्याचे दिसले.

२०१५ मध्ये आमदार पाटील यांच्याच अध्यक्षतेखाली करमाळ्याची आमसभा झाली होती. त्यानंतर त्यांच्याच काळात पुढे २०१९ पर्यंत आमसभा झाली नाही. त्यानंतर माजी आमदार संजयमामा शिंदे यांनीही त्यांच्या काळात आमसभा झाली नव्हती. मात्र विधानसभा निवडणुकी दरम्यान या आमसभेचा प्रश्न चर्चेत आला. होता दरम्यान आमदार पाटील यांनी ही आमसभा अखेर घेतली. गटविकास अधिकारी डॉ. कदम यांनी प्रास्ताविक करत संपूर्ण करमाळा तालुक्याची माहिती सांगितली. त्यानंतर तहसीलदार ठोकडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने करमाळा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू उपलब्ध झाल्याचे सांगितले. त्यानंतर पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थितीतांच्या हस्ते पास देण्यात आले. आदिनाथ कारखान्याचे नूतन संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य यावेळी मंचावर होते. पोलिस निरिक्षक रणजित माने यावेळी उपस्थित होते.

प्रस्ताविकानंतर एक एका विभागप्रमुखांनी कामकाजाचा आढावा मांडला. दरम्यान आढावा मांडायला वेळ जात असल्याची तक्रार मनसेचे संजय घोलप व भाजपचे शशिकांत पवार यांनी मांडली. त्यानंतर विभागनिहाय आलेले प्रश्न घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जेऊर व करमाळा उपविभागाचे उपअभियंता यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. एसटी महामंडळाचे आगर प्रमुख श्री होनराव यांच्याबाबत आलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तरे दिली. ठरलेल्या ठिकाणापर्यंत गाडी जात नसताना जादा पैसे घेणे, दिव्यांगांच्या आरक्षित जागेवर बसणे, गाडी बंद पडणे व पावसात गळती असे प्रश्न यावेळी पवार व पत्रकार घोलप यांच्यासह इतरांनी मांडले. दरम्यान आमदार पाटील यांनी याबाबत एक दक्षता समिती स्थापन करून आढावा घेण्याचे सूचित केले.

भूमी अभिलेखबाबत निलजच्या शारदा गायकवाड यांनी विभाग प्रमुख प्रिया पाटील यांना प्रश्न केला. त्यामध्ये गायकवाड यांनी मुद्देसूद केलेल्या मांडणीने सर्वांचे लक्ष वेधले. अखेर आमदार पाटील यांनी त्यांचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची सूचना केली. या विभागाबाबत अनेक तक्रारी असल्याचे बोलले जाते. मात्र तेवढा आक्रमकपणा सभे दरम्यान दिसला नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाबाबत आदिनाथचे संचालक ऍड. राहुल सावंत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संतोष वारे यांनी प्रश्न मांडले. मात्र शेख यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. दोन महिन्यापूर्वी टंचाई आढावा बैठक झाली होती. त्यातही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नव्हती. तेव्हा पुढील सभेत माहिती देतो असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र त्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे संताप वाढला. नगरपालिकेच्या कामकाजाबाबत सामाजिक कार्यकर्ते फारूक जमादार यांच्यासह इतरांनी प्रश्न केले. त्यावर मुख्याधिकारी तपसे यांनी उत्तर दिले. अतिक्रमणाबाबत बबन चांदगुडे यांनी प्रश्न करत अतिक्रमणाचा प्रश्न मांडला. चिवटे यांच्याकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप करत तेथील जागेवर रुग्णालयच उभारण्याची मागणी त्यांनी केली. त्यावरही तपसे यांनी बचावात्मक उत्तर दिले.

गटविकास अधिकारी डॉ. कदम यांच्याबाबत माजी सभापती ननवरे यांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांना उत्तर देण्याच्या आधीच पुढील प्रश्न घेण्यात आले. त्यामुळे त्यांचा बचाव करण्यात आला का? अशी चर्चा यावेळी झाली. आमसभेत साधारण २०० प्रश्न आले होते. ‘केळी संशोधन केंद्राबाबत काय पाठपुरावा झाला’ हा केळी उत्पादक शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. मात्र त्याची यामध्ये चर्चा झाली नाही. दहिगाव उपसा सिंचन योजनेला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी युवा सेनेचे शंभूराजे फरतडे यांनी केली होती. त्यांना त्यांचा प्रश्न मांडायला वेळ न दिल्यामुळे संताप व्यक्त केला.

आमसभेत प्रश्न मांडण्यासाठी सूचना करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यात अनेक प्रश्न आले होते. मात्र त्यातील सर्व प्रश्न घेण्यात आले नाहीत. काही प्रश्न तत्काळ सोडवण्यात आले होते. तर अनेक प्रश्न ऐनवेळी आले होते. प्रश्न मांडण्यासाठी भरपूर वेळ देण्यात आला होता. अनेक प्रश्नांमध्ये गांभीर्यानुसार आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या आमसभेमुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न मांडता आले. आमसभेचे सूत्रसंचालन सुनील तळेकर यांनी केले.

दहिगाव उपसासिंचन योजनेची पाणी पातळी वाढवण्याचा ठराव
करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसासिंचन ही महत्वकांशी योजना आहे. २२ गावातील १० हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. परंतु उजनी पंप गृहाची पाणी उचलण्याची क्षमता 490 मीटर आहे. त्यामुळे करमाळा तालुक्याला हक्काचे पाणी मिळत नाही. भीमा सिना बोगदा 488. 20 मीटर आहे. मराठवड्यासाठी जाणाऱ्या बोगद्याची ऊंची 487 मीटर आहे. दहिगावची ऊंची कमी असल्याचे योजना लवकर बंद होते. त्याचा परिणाम शेतीवर होत आहे. त्यासाठी पाणी उपसा पातळी 490 वरुन 485 करण्याचा ठराव आमदार पाटील यांनी मंडला. त्याला सर्वानी सहमती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *