करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा एसटी आगारात नवीन बस दाखल झाल्या आहेत. अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची ही मागणी होती. मात्र आज (गुरुवारी) अखेर ती पूर्ण झाली आहे. या एसटी बस दाखल होताच करमाळ्यात श्रेयवाद रंगला असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे. एसटी बस दाखल होताच शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यासह कार्यकर्त्यांशी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला आहे.
करमाळा एसटी बस स्थानक हे सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या बसस्थानकात नवीन एसटी बस याव्यात अशी अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी होती. सतत बंद पडणाऱ्या गाड्या आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास पत्रकार विशाल घोलप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वात प्रथम मांडला होता. त्याचा त्यांनी पाठपुरावाही केला.
माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार संजयमामा शिंदे, बागल गटाने व प्रा. रामदास झोळ यांनी याबाबत निवेदन दिले होते. आमदार नारायण पाटील, भाजपचे गणेश चिवटे, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यासह मोहिते पाटील यांनीही याबाबत निवेदन दिले होते. विधिमंडळातही हा प्रश्न मांडण्यात आला होता.
रस्त्यावर बंद पडणाऱ्या एसटी बस आणि त्यातून नागरिकांना होणारा त्रास हा चर्चेचा विषय ठरला होता. याची दखल घेत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनीही आगारप्रमुख होनराव यांच्यासह इतर पदाधिकारी यांची बैठक घेतली होती. मात्र हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर झाला होता. पत्रकार घोलप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन यावर आवाज उठवणे सुरूच ठेवले होते. मात्र त्यानंतरही हा विषय सुटला नव्हता. त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. तरिही प्रशासकीय व राजकीय स्तरावर प्रत्येकजण या विषयांसाठी पाठपुरावा करत होता. त्याला अखेर यश आले आहे.
हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून पत्रकार घोलप यांनी फक्त वृत्तच दिले नाही तर ते त्यासाठी काही संघटना व राजकीय व्यक्ती यांना यात लक्ष घालण्याचे आवाहनही केले होते. प्रवाशांचे हीत डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी यामध्ये लक्ष घातले होते. करमाळा तालुक्यात या एसटी बस आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसे आपण यामध्ये कसे लक्ष घातले याच्या पोस्ट देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ज्याला श्रेय घ्यायचे आहे त्याला घेऊद्या पण करमाळ्याच्या विकासासाठीही असेच सर्वांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.
जातेगाव – करमाळा – टेंभुर्णी महामार्ग, एमआयडीसी, केळी संशोधन केंद्र, कुकडी उजनी उपसासिंचन योजना- रिटेवाडी उपसा सिंचन योजना यासह आदिनाथ सहकारी साखर कारखाना देखील सुरु होणे आवश्यक आहे हीच अपेक्षा! सध्या एसटी बसवरून सुरु असलेल्या श्रेयवादावरून तुम्हीच ठरवा नेमक्या बस कोणामुळे आल्या. विकास कामांसाठी हा श्रेयवाद आवश्यकच आहे. मात्र यातून विकास कामांना खीळ बसणार नाही हेही पहाणे आवश्यक आहे. या एसटीच्या प्रश्नाबाबत प्रा. झोळ यांनी हॉटेल राजयोग येथे पत्रकार घोलप यांचा विशेष सन्मान केला होता याचीही आठवण या ठिकाणी करून देणे आवश्यक वाटते.