सोलापूर : सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबेल. त्यामुळे उजनी जल पर्यटन 190 कोटी 19 लाख, कृषी पर्यटन 19 कोटी 30 लाख, विनयार्ड पर्यटन 48 कोटी 26 लाख, धार्मिक पर्यटन 25 कोटी असा 282.75 कोटीचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज (बुधवारी) मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीकडे सादर केला. समितीकडून या आराखड्यासाठी 282.75 कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीमध्ये प्रथम सादर करण्यात आला. जिल्ह्याच्या पर्यटनाच्या अनुषंगाने महत्त्वाच्याबाबी यात नमूद करून त्यासाठी लागणारी तरतूद करून हा आराखडा समितीने मंजूर केला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता प्रदान केली. जून 2024 मध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा पर्यटन आराखडा सादर केला होता. त्यावेळी आमदार संजयमामा शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी या आराखड्याला तत्वत: मंजुरी दिली होती.

पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेला हा आराखडा उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आला. मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने या आराखड्यातील बाबींचे बारकाईने माहिती घेऊन यातील 282.75 कोटीच्या विविध कामांना मंजुरी दिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचे उच्चाधिकार समितीसमोर पीपीटीद्वारे सादरीकरण केले. हे सादरीकरण करत असताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती तसेच पर्यटनासाठी खूप महत्त्वपूर्ण जिल्हा असल्याची माहिती देऊन हा आराखडा मंजूर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यास मदत होईल. तसेच, येथून होणारे स्थलांतर रोखले जाईल यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा असल्याचे समितीला जिल्हाधिकारी यांनी पटवून दिले.

राज्यासाठी पथ दर्शक प्रकल्प
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उच्चाधिकार समिती समोर सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचे ज्या पद्धतीने सादरीकरण केले. तसेच, या आराखड्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनाच्या दृष्टीने अंतर्भूत केलेल्या बाबी किती महत्त्वपूर्ण आहेत याची जाणीव समितीला झाली. आराखड्याची मांडणी व सादरीकरणाबद्दल उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा मुख्य सचिव व अन्य सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे विशेष कौतुक केले. तसेच, हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शक असेल असेही समितीने सांगितले. या बैठकीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी उपस्थित होते.

एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प
जिल्ह्यात संपूर्ण जगातील पर्यटकांना जल, कृषी, विनयार्ड व धार्मिक पर्यटनाचा अनुभव देणे हा या एकात्मिक पर्यटन प्रकल्पाचा आत्मा व यु. एस. पी. देखील आहे. यासाठी प्रकल्पातून जिल्ह्यात एकात्मिक पर्यटन सर्किट विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने जिल्ह्यात वेगवेगळी पथदर्शी उदाहरणे (कृषी पर्यटन, कृषी मॉल, जल पर्यटन ई बाबतची मॉडेल्स) उभी राहतील की, जी पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील उद्योजकांना पर्यटन क्षेत्रातील विविध संधी दर्शवतील व यासारखे उपक्रम एक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रेरणा देतील. यामुळे जिल्ह्यात पुढील 8-10 वर्षात पर्यटन उद्योगात मोठी आर्थिक गुंतवणूक होऊन विकासाची प्रकिया वेग धरेल व एकंदरीत स्थानिक व जिल्ह्यावासियांचे जीवनमान उंचावेल.

एकात्मिक पर्यटन सर्किटमध्ये उजनी धरणातील जल पर्यटन हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असेल. पर्यटकांना यासोबतच येथे धरणाच्या जलाशयाचा भाग, सभोवतालील निसर्गरम्य परिसर, जल क्रीडा उपक्रम, विविध देशी तसेच विदेशी पक्षी, ईत्यादीचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळता येईल. पुढे सर्किटमध्ये परिसरातील कृषी पर्यटन केंद्रे, धार्मिक स्थळे, विनयार्ड पर्यटन, तलाव, किल्ले, वारसा स्थळे यांना भेटी देता येतील. पर्यटकांना साधारणत: आठवडाभर पर्यटन सर्किटमध्ये असलेल्या विविध स्थळांना (जल, धार्मिक, कृषी, नैसर्गिक विनयार्ड पर्यटन स्थळांना) भेटी देऊन पर्यटनाचा आस्वाद घेता येणार आहे. निश्चितच यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटन पूरक उद्योग वाढतील, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल व यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होऊन जिल्ह्याची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढण्यासाठी गती मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग उभे राहण्यास चालना मिळेल व त्यामुळे टूर गाइड, हॉटेल आणि रिसॉर्ट कर्मचारी, अन्न आणि पेय सेवा कर्मचारी, ट्रॅव्हल एजंट, वाहतूक सेवा (बस, कार, टॅक्सी) सुविधा देणारे, विविध कार्यक्रमांचे नियोजन करणारे, मनोरंजनाचे कार्यक्रम करणारे कलाकार, लोक कलाकार, दुकानदार व किरकोळ वस्तू विक्रेते, संग्रहालय आणि वारसा साइट कर्मचारी, संवर्धन कामगार, ग्राहक सेवा प्रतिनिधी, बांधकाम व देखभाल दुरुस्ती कामगार,स्पा आणि वेलनेस कर्मचारी, स्वच्छता सेवा सुविधा देणारे कामगार यांचेसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

प्रकल्पाची 7 प्रमुख वैशिट्ये…
जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटन स्थळांचे (जल, कृषी, विनयार्ड व धार्मिक) अनोखे मिश्रण (blend) एकाच ठिकाणी अनुभवता येणार.

पक्षी निरीक्षण व नौकायन : पर्यटकांना उजनी जलाशय परीसरात पक्षी निरीक्षण आणि नौकायनासाठी एक स्वप्नभूमी असेल.
स्थानिकांचा प्रकल्पात सक्रीय सहभाग : स्थानिक महिला गट व शेतकरी उत्पादक गटांचा प्रकल्पात सक्रीय सहभाग.
उपजीविका विकास : प्रकल्पातून स्थानिकांचा पर्यटनावर आधारित उपजीविका विकास व बळकटीकरणावर भर.
डिजीटल वेब पोर्टल : पर्यटन सर्किट व त्यातील स्थळांच्या प्रभावी मार्केटिंग तसेच पर्यटकांना टूर बुकिंगसाठी एक उपयुक्त साधन.
सर्वांसाठी पॅकेजेस : पर्यटकांच्या सर्किट मध्ये राहण्याचा कालावधी व खर्च करण्याची क्षमता यांचा विचार करून टूर पॅकेजेस निर्मिती व प्रचार.
स्थानिकांची क्षमता बांधणी : इच्छुक बचत गट, उत्पादक गट, उद्योजक यांच्या कौशल्य विकासावर भर.

प्रमुख घटक व अंदाजपत्रक
नियोजित उजनी जलाशय जलपर्यटन, कृषी पर्यटन, विनयार्ड पर्यटन व धार्मिक पर्यटन चालना देणाऱ्या प्रकल्पाच्या उभारणीचा एकत्रित खर्च 282.75 कोटी असून त्याचा घटकनिहाय खर्च खाली दिला आहे.

जल पर्यटन : एकात्मिक पर्यटन सर्किटमध्ये उजनी धरणातील जल पर्यटन हे पर्याटकांसाठीचे मुख्य आकर्षण असेल. उजनी जलाशयाचे पात्र सुमारे 90 किमीचे पात्र असून त्यात प्रवास करताना गोड्या पाण्याच्या समुद्राचा अनुभव येतो, धरणाच्या जलाशय परिसरात विविध देशी व परदेशी पक्षांचा वावर असतो. जलाशयाच्या अवतीभोवती हिरव्यागार निसर्गाचे व शेतींचे मनमोहक दृश्य पहावयास मिळते. प्रकल्प विकसित करण्यासाठी पाटबंधारे विभागाची जागा उपलब्ध असून ती जागा राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली आहे.

जलपर्यटन हे लोकप्रिय आणि आकर्षक (Glamorous) पर्यटन असून व ते कमी वेळात तयार होते. असे हे जागतिक दर्जाचे जल पर्यटन सोलापूर जिल्ह्याची नवीन ओळख निर्माण करू शकते. जल पर्यटन प्रकल्पास कमी जमीन लागते आणि पाण्यावर अवलंबून असते. जलपर्यटनामुळे रोजगाराची निर्मिती, स्थानिक युवकांना कमीत कमी प्रशिक्षणाने चांगल्या पगाराच्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील. याचा सोलापूर जिल्ह्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील जलपर्यटनमध्ये रॉक पूल- सर्व वयोगटातील पर्यटकांना पोहण्यासाठी भारतातील सर्वात मोठा जलतरण तलाव असणार आहे, वॉटर फ्रंट डेक, लाईट हाऊस, बोट रँम्प, मरीना बोटीची उच्च दर्जाची पार्किंग व्यवस्था इत्यादी पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठी 190.19 कोटी प्रस्तावित करण्यात आला आहे.

कृषी पर्यटन केंद्र : पाच ठिकाणी प्रमुख मंदिरे व धरणासभोवतालच्या परिसरात
कॉटेजस, निवास व्यवस्था, लोकनिवास (Dormitory), डायनिंग हाँल व किचनसाठीची ईमारत, शेततळे, पारंपारिक खेळ सुलभिकरण क्षेत्र (मैदान) व मुलभूत साहित्य, ग्रामीण कला व मनोरंजन कार्यक्रम सादरीकरण केंद्र (AV System), वेगवेगळ्या जुन्या वस्तू व साहित्याचे युनिट उपलब्धता, स्वागत कमान + साइंन बोर्ड, नर्सरी, मचाण, जनरेटर

कृषी मॉल : 10 ठिकाणी प्रमुख धार्मिक मार्गांवर टोल प्लाझा जवळ
मॉल बांधकाम, फर्निचर आणि फिक्स्चर, रॅकस, ट्रॉली, पाणी पुरवठा व स्वच्छता सुविधा, पार्किंग व्यवस्था. इत्यादीसाठी 19.30 कोटी प्रस्तावित करण्यात आली आहे.

विनयार्ड पर्यटन
खुडूस (ता. माळशिरस) येथे विनयार्ड प्रकल्प उभारणे. पारंपारिक घरे, ट्री हाऊस, वैदिक घरे, साहसी उद्यान, लाकडी शैलीचे घरे, ग्लॅम्पिंग पॉड्स, रेस्टॉरंट, कॉंफरन्स, रूम इत्यादीसाठी 48.26 कोटी प्रस्तावित करण्यात आली आहे.

धार्मिक पर्यटन : ५ मंदिरे
श्री कमलादेवी मंदिर (करमाळा), श्री सिद्धेश्वर मंदिर (सोलापूर), श्री शिवपार्वती मंदिर व शिवसृष्टी (अकलूज), श्री नागनाथ मंदीर (वडवळ, ता. मोहोळ) आणि श्री सिद्धेश्वर मंदिर (माचणुर, ता. मंगळवेढा) येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.

पिण्याच्या पाण्याची सुविधा, माहिती फलक, स्वच्छतागृह व विश्रांतीगृह, बैठक व्यवस्था, निवारा शेड, पदपथ, पेव्हर ब्लॉक, कचराकूंडी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ई. त्यासाठी 25 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहे.

एकात्मिक पर्यटन प्रकल्पांतर्गत प्रस्तावीत केलेले वरील सर्व बाबींचा पर्यटन धोरण, 2024 मध्ये उल्लेख असून जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील इतर शासकीय संलग्न विभाग (कृषी, MSRLM, MAVIM, सहकार विभाग, जिल्हा परिषद- ग्रामपंचायात विभाग ई.) हे DoT/MTDC च्या सहकार्याने प्रकल्पातील तरतुदींव्यतिरिक्त पर्यटन व पर्यटन पूरक घटकांसाठी पर्यटन धोरणात प्रस्तावीत केलेल्या विविध आर्थिक व बिगर आर्थिक प्रोत्साहनपर बाबींची माहिती स्थानिक इच्छुक व्यावसायिक, उद्योजक, महिलांचे बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट तसेच विविध सेवा पुरवठादार इत्यादींपर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी तसेच त्यांना नियोजित पर्यटन सर्किट मध्ये पर्यटन / पर्यटन पूरक व्यवसाय उभे करण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे.

प्रकल्पाचे फायदे
या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्यास एकाच ठिकाणी जल, कृषी व विनयार्ड, धार्मिक पर्यटनाचे अनोखे मिश्रण असल्याने सोलापूर जिल्ह्याकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील. स्थानिक पातळीवर थेट रोजगार निर्मितीस तसेच स्वयंरोजगार निर्मितीस चालना मिळेल. समूह (cluster) पातळीवर शेती, शेतीपूरक व इतर व्यवसाय (On farm, Off farm, Non farm enterprises) उभारणीसाठी मदत होईल. जिल्यातील विशिष्ट उत्पादनांना (Niche products) उदा: मालदांडी ज्वारी, डाळिंब, सोलापुरी टेरी टॉवेल आणि चादर, शेंगदाणा चटणी, घोंगड्या, बेदाणे, रोस्टेड हुरडा, कडक भाकरी थेट बाजारपेठ उपलब्ध होईल.

शहरी पर्यटकांशी ग्रामस्थांचा संपर्क आणि ग्रामीण जीवनशैली, लोककला, संस्कृती ई. प्रसार व संवर्धन होण्यासाठी सहाय्य होईल. जिल्ह्यात विनयार्ड पर्यटनास चालना मिळेल. ग्रामीण भागातील कृषी उत्पादक कंपन्या, महिलांचे बचत गट, उत्पादक गट, PACS यांच्यामध्ये देखील व्यावसाईक दृष्टीकोन विकसित होईल व ते खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रकीयेत सहभागी होतील. (Mainstreaming of CBOs) शेतमालाला शेतातच हक्काचा शाश्वत ग्राहक मिळेल.

ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी सहाय्य होईल. ग्रामीण भागातून पुणे- मुंबई व इतर शहरांकडे वेगाने होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी तसेच स्तलांतरित ग्रामस्थांना आपल्या गावाकडे परत आणण्यासाठी या प्रकल्पाची मदत होईल. जिल्ह्यातील पर्यटनाचा चेहरा बदलण्यासाठी उपयुक्त तसेच राष्ट्रीय व जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूरची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *