शिवराज्याभिषेक सोहळा : डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण, सोहळ्यास हजारो नागरिकांकडून उभे राहून मानवंदना

Shivgarjana Mahanatyam in the premises of Haribhai Devkaran Prashala in coordination with the Cultural Affairs Department and the District Administration

सोलापूर : सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात सुरु झालेल्या ‘शिवगर्जना महानाट्या’ला दुसऱ्या दिवशीही हजारो विद्यार्थ्यांबरोबर शिवप्रेमी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेले शिवगर्जना हे महानाट्य नागरिकांच्या पसंतीस उतरले असून, सोलापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर गर्दी केली आहे.

या महानाट्यात बाराव्या शतकापासून ते शिवजन्म व शिव जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळा असे सादरीकरण करण्यात आलेले असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे मैदानावर उपस्थित शिवप्रेमी नागरिकांच्या अंगावर रोमांच निर्माण करणारा क्षण होता. आनंदाचा, उत्साहाचा क्षण होता… हा सोहळा म्हणजे डोळ्याचे पारणे फिटले असे आपसूक तोंडातून निघेल असाच तो क्षण होता. या दिमाखदार सोहळ्याने मैदानावर उपस्थित सर्व नागरिकांचे मन जिंकले होते. या सोहळ्यात सर्व नागरिक मैदानावर उपस्थित राहून जय शिवाजी… जय भवानी चा जयघोष करत होते. व सर्वजण उभे राहून या सोहळ्यास मानवंदना देत होते.

हा सर्व क्षण म्हणजे 6 जून 1674 ला प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला त्या क्षणाची आठवण करून देऊन संपूर्ण मराठी नागरिकांमध्ये या नाटकातील या राज्याभिषेक सोहळ्यामुळे त्या क्षणाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. आपण 6 जून 1674 रोजी प्रत्यक्ष रायगडावर उपस्थित आहोत की काय अशी भावना मनात निर्माण झाली असेल याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.

प्रारंभी शिवगर्जना महानाट्याच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगाचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी महसूल तथा अप्पर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एसीपी राजन माने, राघवेंद्र क्षीरसागर, सहाय्यक पुरवठा अधिकारी समीर यादव, महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्निल यादव आदी उपस्थित होते. या महानाट्याचा आज (सोमवारी) 12 फेब्रुवारीला सायंकाळी 7 ते 10 या कालावधीत तिसरा व अंतिम प्रयोग सादर होणार आहे. जिल्ह्यातील ज्या शिवप्रेमी नागरिकांनी या महानाट्याचा लाभ घेतलेला नाही त्या नागरिकांना हे महानाट्य पाहण्याची शेवटची संधी आहे. तरी नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून शिवचरित्राचे सादरीकरण प्रत्यक्ष पाहण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *