करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची मानली जाणाऱ्या दहिगाव उपसासिंचन योजनेच्या बंदनलिका कामाचे पाच महिन्यात दुसऱ्यांदा पाईप जाळले आहेत. यामुळे करमाळा तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गुरुवारी (ता. ८) दुपारी तीन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर संबंधित मक्तेदार कंपनीचे कर्मचारी नचिकेत दिलीप राजमाने यांच्या फिर्यादीनुसार आज (शुक्रवारी) एका अनोळखी संशयिताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दहिगाव उपसासिंचन योजनेचे कुंभेज येथील कॅनलमध्ये पाईप टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी ठेवण्यात आलेल्या पाईपजवळ कोणतीही ज्वलनशील वस्तू नव्हती. तरीदेखील पाईप जळाले आहेत. यामध्ये कंपनीचे १३ लाख २८ हजार २०८ रुपयांचे ५६ पाईप जळाले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी करमाळा पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे.
‘करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील २४ गावांची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम चार महिन्यापासून बंद आहे. उजवी लघवीतरीका क्र. ६ वरील बंदनलिका वितरण प्रणालीसाठी आणलेले पाईप आतापर्यंत जाळण्यात आले आहेत. यासंबंधी करमाळा पोलिस स्टेशनला दोन वेळेस गुन्हा दाखल झाला आहे. अद्यापही यातील संशयित पकडण्यात आले नाहीत. प्रशासनाच्या कुचकामी धोरणाविरोधात राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे. १६ मे रोजी अर्जुननगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा’, तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांनी दिला आहे.