महायुती आदिनाथला नवसंजीवनी देऊ शकते; पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावे : चिवटे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला नवसंजीवनी देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक महायुती सरकारमध्येच असून यासाठी तालुक्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी, अशी भूमिका आदिनाथ कारखान्याचे माजी प्रशासकीय संचालक व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मांडली आहे.

आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातून बंद पडलेला आदिनाथ सुरू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली होती. तेव्हा एक लाख टन उसाचे गाळप झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी नुकतेच सात कारखान्यांना अकराशे कोटीची आर्थिक मदत देऊन कारखाने वाचविले आहेत.

चिवटे म्हणाले, प्रशासक असताना आदिनाथ कारखान्याचा 189 कोटीचा प्रस्ताव सरकार दरबारी सादर केला असून तत्कालीन साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी याला शिफारस दिलेली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर आजिनाथ कारखाना विस्तारीकरण होऊन प्रतिदिन १० हजार मॅट्रिक टन प्रति दिवस गाळप करू शकतो. प्रशासकीय काळात आदिनाथ कारखान्याच्या नवीन दोन आठ इंची पाईपलाईन पूर्ण झाली असून उर्वरित शेतजमीन एका नामांकित केळी रोपे उत्पादन संवर्धन कंपनीने भाड्याने मागितलेली आहे. प्रशासकीय काळात रस्त्याच्याकडेने जवळपास 300 व्यावसायिक गाळे काढण्याची प्रयोजन केले होते.

महायुतीच्या विचाराचे पदाधिकारी जर एकत्र येऊन कारखाना निवडणूक लढवली तर आदिनाथ वाचू शकतो. यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे, युवा नेते दिग्विजय बागल यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी भूमिका शिवसेना चिवटे यांनी मांडली आहे.

मध्यस्ताची भूमिका विलासराव घुमरे यांनी पार पाडावी
माजी आमदार शिंदे घुमरे यांची व्याही असून दिग्विजय बागल यांचे काका आहेत. दोन्ही तिन्ही गटात त्यांचे चांगले संबंध असून आदिनाथच्या हितासाठी त्यांनी मध्यस्थीची भूमिका पार पाडावी, अशी मागणी ही चिवटे त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *