आळजापूरचे सरपंच रोडे यांना जिल्हा परिषदेच्या ‘सीईओ’ आव्हाळे यांचा दणका; सलग सहा महिने मीटिंगला गैरहजर राहिले ठरवले अपात्र

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच संजय रोडे हे सलग सहा महिनेपेक्षा जास्त दिवस ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगला गैरहजर राहिल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले असून सदस्यपद रद्द करण्यात आले आहे. रविकांत घोडके यांनी केलेल्या तक्रारीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणात ऍड. नितीन गपाट, ऍड. शेखर घाडगे, ऍड. एल. ए. गवई व ऍड. डी. एन. शिंदे यांनी काम पाहिले आहे.

सरपंच रोडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कलावती काळे, पार्वती रोडे व वत्सला काळे हे मासिक बैठकांना गैरहजर राहत असल्याची तक्रार घोडके यांनी केली होती. मुख्याधिकारी आव्हाळे यांनी आदेशात म्हटले आहे की, पंचायतीच्या परवानगीशिवाय सलग सहा महिने अनुपस्थित असलेल्या सदस्याचे पद रद्द होते. घोडके यांनी केलेल्या तक्रारीनुसार कलावती काळे, वत्सला काळे व पार्वती रोडे यांचा जुलै २०२२ पासून डिसेंबर २०२२ या कालावधीत गैरहजर कालावधी हा १८० दिवसांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्या पात्र ठरत आहेत. मात्र संजय रोडे यांचा गैरहजर कालावधी १८० दिवसांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

रोडे हे २१ जून २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत गैरहजर आहेत. सूचक किंवा अनुमोदक म्हणूनही त्यांचा उल्लेख नाही. त्यांचा गैरहजर कालावधी २०५ दिवस होत आहे. मासिक सभांना २५ अनुपस्थितीचा त्यांनी अर्ज केला होता. मात्र रजा मंजुरीचा अधिकार ग्रामपंचायतीस असून तसा ठराव होणे आवश्यक आहे. ग्रामसेवक दत्तात्रय निकम यांच्या जबाबानुसार रोडे हे एका सभेच्या (पृष्ठ क्र. ६९) नोंदीनुसार उशिरा आले होते. त्यांनी रजिस्टर घेऊन खाडाखोड करत सही केली होती. दरम्यान रोडे यांनी संबंधित सही चुकून झाली असल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणात रोडे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या आदेशाची प्रत मिळाली असल्याचे घोडके यांनी सांगितले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कैलास रोडे, निखिल रोडे, लालासाहेब काळे, माजी सरपंच युवराज गपाट, दत्तात्रय टेंबाळे, दत्तात्रय रोडे आदी उपस्थित होते.

रोडे म्हणाले, झालेली कारवाई ही राजकीय दृष्ट्या झाली आहे. काही बैठका या अजेंडा न काढता झाल्या होत्या. या प्रकरणात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. चांगली माणसं राजकारणात टिकत नाहीत हे यावरून सिद्ध होत आहे. गावासाठी चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न होता. जो निकाल झाला तो मान्य आहे याविरुद्ध मी अपिलातही जाणार नाही. गावाला वेठीस धरून मी कोणतेही काम करणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *