‘आदिनाथ’च्या निवडणुकीनंतर बदलणार करमाळ्याच्या राजकारणाचे समीकरण!

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद असला तरी सर्वांचे निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. हा कारखाना ताब्यात घेऊन सुरु केला तर त्याचा प्रचंड फायदा संबंधित गटाला होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर तालुक्याच्या राजकारणाचे समीकरण बदलू शकते. त्यामुळे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बिनविरोधचे आवाहन केले असले तरी सध्या सर्व गट फायदा- तोट्याचा विचार करत आहेत. कोणाचे किती अर्ज येतील आणि किती पात्र होतील त्यावरच पुढचा निर्णय ठरणार असल्याचे चित्र आहे.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हे तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर आहे. या कारखान्याच्या २१ संचालकांसाठी निवडणूक जाहीर झाली असून १७ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवार (ता. १७) शेवटचा दिवस आहे. त्यानंतर १८ मार्चला छानणी व १९ पासून २ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी कारखाना बिनविरोध की निवडणूक लागेल हे स्पष्ट होणार आहे. तर ३ एप्रिलला पात्र अर्जांची नावे प्रसिद्ध होणार आहेत.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा करमाळ्याच्या राजकारणाचा कायम केंद्रबिंदू राहिलेला आहे. हा कारखाना बंद असला तरी त्यामध्ये प्रमुख गटांना हवा असतो, असे दिसत आहे. या कारखान्याची लांबलेली निवडणूक आता विधानसभा निवडणूक झाल्यावर होत आहे. जून २०२२ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्यानंतर काही दिवस मुदतवाढ आणि नंतर प्रशासक आले होते. आता होणाऱ्या या निवडणुकीनंतर करमाळ्याच्या राजकारणाचे चित्र बदलणार आहे. अडचणीत असलेला हा कारखाना ताब्यात आल्यानंतर सुरु करणे हे आव्हान असणार आहे. ते आव्हान पेलले तर येणाऱ्या काळात त्याचा फायदा होणार आहे.

अडचणीत असलेला हा कारखाना बिनविरोध करण्याचे आव्हान माजी आमदार जगताप यांनी केले. मात्र त्याला अजूनतरी उघडपणे कोणीही प्रतिसाद दिलेला दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी माजी आमदार जगताप व आमदार पाटील यांच्यात भेट झाली होती. तेथे हा कारखाना बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे. मात्र सध्या जगताप व पाटील हे एकत्रच आहेत. त्यामुळे निवडणूक लागली तरी ते एकत्रच राहतील. यामध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे व भाजपच्या रश्मी बागल व बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांच्या भूमिका महत्वाच्या राहणार आहेत. त्यांनी अधिकृतरीत्या अजूनही भूमिका मांडलेल्या नाहीत. उलट इच्छुकांनी त्यांनी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *