उजनीमुळे जिल्ह्यातील मोहोळ, माढा व पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसित झालेल्या १६ गावांसाठी सरकारकडून १ कोटी ४० लाख ८० हजार निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी नागरी सुविधांसाठी वापरला जाणार आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने आज (मंगळवारी) याबाबत आदेश काढला आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2023/07/e6873a22-9402-40d9-8213-93236847218f-1024x1024.jpg)
उजनी प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा व पंढरपूर तालुक्यातील गावठाणातील नागरी सुविधा कामांना निधी वितरीत केला जाणार आहे. भीमा कालवा मंडळचे सहायक अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार हा निधी दिला जाणार आहे. २०२३- २४ या वर्षात हा निधी खर्च केला जाणार आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2023/07/Mane-1-1024x683.jpg)
यामध्ये पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे, पटवर्धन कुरली, आव्हे, आढीव देगाव, मेढापूर. माढा तालुक्यातील उजनी टें., शिराळ टे, आलेगाव खु., सुर्ली, फूटजळगाव व मोहोळ तालुक्यातील कातेवाडी येथे गुरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बांधकाम करणे यासाठी निधी वितरित केला जाणार आहे. याशिवाय माढा तालुक्यातील सुर्ली येथे ग्रामपंचायत कार्यालय, शाळा संरक्षक भिंत बांधकाम व डांबरी पोहोच रस्त्यावरील नालामोरीचे काम करण्यासाठी निधी वितरित केला जाणार आहे. याबरोबर आलेगाव खुर्द येथे स्मशानभूमीसाठी निधी वितरित केला जाणार आहे.