सोलापूर : राज्यातील पोलिस पाटलांना मिळणारे मानधन तुटपुंजे असून पोलिस पाटलांची मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोली गावचे पोलिस पाटील विजय वाघमारे हे मंगळवार (ता. १४) पासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.
पोलिस पाटील हा गावस्तरावरील महत्वाचा घटक असून सरकार आणि गाव यामधील समन्वयाचे काम चोखपणे पोलिस पाटील पार पाडतात. आजच्या या महागाईच्या काळात पोलिस पाटील हे अल्प मानधनावर काम करीत आहेत. मानधन दर महिन्याला २० हजार रुपये मिळावे. नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे, पोलिस पाटलांचा प्रवास भत्ता दुप्पट करण्यात यावा, वयोमर्यादा वाढविण्यात यावी, निवृत्ती समयी २० लाख रुपये देण्यात यावेत. अशा मागण्या घेऊन विजय वाघमारे हे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस पाटील हे पद सरकार प्रशासन व जनता यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. गावामध्ये कायदा, सुव्यवस्था, जातीय सलोखा राखणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य करणे, शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनजागृती करीत ती यशस्वी करणे. स्थानिक पातळीवर विकासकामात येणारे अडथळे दुर करणे, अवैध धंद्याना प्रतिबंध करणे, गावातील सण उत्सव शांततेत पार पाडणे, आरोपींचा ठाव ठिकाणा कळवून त्यास पकडून देण्यास पोलिसांना मदत करणे, रोगराई महामारीच्या काळात खबरदारी घेत मदतकार्य करणे. ज्यांच्यामुळे गावात कायदा सुव्यवस्था व जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण होणार आहे. अशांची गुप्त माहिती संबंधित अधिकारी प्रशासनाला देणे, गृह, महसुल, वने, सहकार, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, ग्रामविकास सामान्य प्रशासन विभागासह अन्य विभागातील कामकाजाशी संबंधित राहुन कामे करावी लागतात. पोलिस पाटील हे पद स्थानिक असल्यामुळे गावात २४ तास सतर्क राहावे लागते.